Friday, April 14, 2017

मी (तिच्याइतकी) आनंदी का नाही?

मी लहान असताना माझ्या आजीनी मला पत्र कसे लिहायचे हे शिकवले होते. आलेल्या पत्राला उत्तर द्यायचे असल्यास, सुरुवातीच्या मजकुरात संपूर्णपणे "त्यांच्यावर" लिहायचे. यात, "पुण्यात खूप पाऊस होतोय हे वाचून आनंद झाला" पासून, "तुमच्या नवीन घराबद्दल वाचून आनंद वाटला, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा", पर्यंत सगळं यायचं. शेवटच्या परिच्छेदात आपली माहिती द्यायची. आणि शेवटच्या ओळीत घरातील सगळ्यांची चौकशी करायची. असे साधे साधे नियम होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत, ती काही पत्रं मला लिहायला लावायची आणि तपासायची. पत्रं लिहिण्यासाठी पोस्टकार्ड आणण्यापासून ते टाकताना लावायच्या स्टॅम्पपर्यंत सगळं मला करायला लावायची. मग पाठवलेल्या पत्रांच्या उत्तराची वाट बघण्यात वेगळीच मजा असायची. पत्रव्यवहारातून अप्रत्यक्ष संवाद व्हायचा, ज्यात काही औपचारिकता असायची, जसे, सा. न. वि. वी लिहिणे, मोठ्यांचा उल्लेख करताना तीर्थरूप वापरणे आणि लहानांचा करताना चिरंजीव वापरणे. अनौपचारिकतादेखील असायची, जिथे आपल्याला एखाद्या विषयाबद्दल काय वाटते आहे, याची दिलखुलास एकतर्फी मांडणी करता यायची. कधी कधी तशी मांडणी वाचणाऱ्याला आवडेलच याची खात्री नसायची. पण तो संवाद अप्रत्यक्ष आहे म्हणून लिहिणाऱ्याला मन मोकळं केल्याची भावना यायची.
आता तसे पत्रव्यवहार बंद झाले, पण त्यांची जागा एका दुसऱ्या अप्रत्यक्ष संवादाच्या माध्यमाने घेतली आहे. सोशल मीडिया.
हल्ली, कुणाची बरेच दिवसांनी भेट झाली की पूर्वी विचारले जाणारे कित्येक प्रश्न गैरलागू होतात.
"अरे! तू अजिबात बदलला नाहीस!"
"कुठे असतोस सध्या?"
"छोट्याचं काय चाललंय?"
"तो, तुझा मित्र क्ष आता काय करतो रे?"
असले सगळे प्रश्न सुद्धा, पत्रव्यवहारासारखेच मृत झालेत, कारण हल्ली या सगळ्याची उत्तरं आपल्या खिशात नाहीतर पर्समध्येच सापडतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम असल्या सोशल मीडिया संकेतस्थळांमुळे, संवादातील औपचारिकता निघून जाऊ लागली आहे. एकीकडे हे चांगले आहे. सोशल मीडियामुळे लोकांचे फोन, पत्ते जपून ठेवणे, पत्ता किंवा फोन नंबर बदल्यास सगळ्यांना एक एक करून तो कळवणे, हे सगळे आता एका मेसेज मध्ये नाहीतर एका फेसबुक पोस्टीत करता येते. तसेच शाळेपासून ते अगदी शेवटच्या नोकरीपर्यंत झालेला संपर्कसंचय आपल्या पाठीमागून आपल्या पाऊलखुणा याव्यात तसा येत असतो. तो जपून ठेवण्यासाठी आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून लोकांची चौकशी करायला फोन करणे, आवर्जून भेटायला जाणे अशा गोष्टी कमी केल्या तरी संपर्क ठेवता येतो.
जिथे पात्रात लिहिलेल्या काही गोष्टी आपल्याला कल्पनेने समजून घ्याव्या लागायच्या, त्या आता फोटोच्या नाहीतर व्हिडियोच्या माध्यमातून थेट आपल्यासमोर दिसायला लागल्या आहेत. पण हे होण्यात, पत्रव्यवहारातला एक महत्वाचा भाग गळून पडला आहे. तो म्हणजे आपण आस्थेने केलेल्या दुसऱ्याच्या चौकशीचा. फेसबुकच्या आपल्या पानावर आपल्याला जगाला कशाची माहिती द्यायचीये ती आपण टाकतो, तशीच दुसऱ्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काय सांगायचे आहे हे पाहतो. जे आवडेल त्यावर निळ्या अंगठ्याची मोहोर लावून आवडले असे जाहीर करतो. पण या संवादात, आजीचा तो "आपले" विषय बाजूला ठेऊन आधी "त्यांची" चौकशी करायचा शिष्टाचार आणि अट्टाहास निघून गेल्यासारखा वाटतो. आणि कुठेतरी बारीक, असूयेची झालर या सगळ्या देवाणघेवाणीत आल्यासारखी जाणवते.
अलीकडच्या काळात विविध देशातील शात्रज्ञांच्या कामातून सोशल मीडिया आणि एकटेपणा यावर बरेच संशोधन होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा अतिरेक एकटेपणाच्या भावनेला वाढवणारा आहे असे सिद्ध होते आहे. तसेच असा अतिरेक उदासीनता वाढवण्याचे काम करू शकतो असेही संशोधनातून सिद्ध होते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे दिसून येते की सोशल मीडियावर, दुसऱ्यांचे आनंदी आणि ऐषोआरामाचे आयुष्य बघून तरुणांना वैषम्य,उदासीनता आणि त्यांच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतघ्नता वाटते. यातील कृतघ्नतेच्या भावनेमुळे ते पुन्हा पुन्हा एकटेपणा आणि उदासीतेच्या चक्रामध्ये अडकतात. डिजिटल फोटोग्राफीमुळे आणि त्याच्या स्मार्टफोनशी झालेल्या संयोगामुळे आयुष्यातले साधे साधे प्रसंग आता कायमचे टिपून ठेवता येतात. आणि एखाद्याच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे साथीदार होण्याची जबाबदारी आपल्यावर येते. माणूस स्वभावत: जसा सांघिक आयुष्य आवडणारा प्राणी आहे, तसंच वरचढ ठरण्यासाठी स्पर्धा करणे, हादेखील मानवी गुणधर्म आहे. सोशल मीडियामधून या दोन्ही गुणधर्मांचे चांगले वाईट परिणाम बघायला मिळतात.
तसेच, संवादाच्या अप्रत्यक्ष असल्यामुळे, काही बाबतीत, खासकरून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्यांची भीड चेपून संवादाचे विघटन गुंडगिरीमध्ये होताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर टोपण नावाने वावरणारे लोक जसे सोशल मीडियावर लिहतात तसे ते प्रत्यक्ष बोलू शकतील का हा मुद्दा विचार कारण्यासाखा आहे. आपल्याला कुणी ओळखत नाही म्हणून आपण एखाद्या स्त्रीला बलात्काराची धमकी देऊ शकतो, हा आत्मविश्वास फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादीत असतो हे कितीही खरे असले, तरी शहरी तरुण/तरुणी त्यांचा अधिकांश दिवस सोशल मीडियावर घालवतात हे गृहीत धरल्यावर अशी पडद्याआडून केलेली वागणूकदेखील धोकादायक वाटू लागते.
एखादी तान्ह्या बाळाची आई जेव्हा तिचे आणि तिच्या गोंडस बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकते, तेव्हा तिला त्या बाळासाठी रात्री अपरात्री उठावे लागणे आणि तिची झालेली दमछाक आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. एखाद्या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोशूट टाकले, तर ते कुठे करायचे आणि कसे करायचे याबद्दलच त्यांच्यात झालेली असंख्य भांडणे त्या फोटोंमध्ये दिसत नाहीत. आणि ग्लॅमरस कपडे घालणाऱ्या, आणि मेकअप करून असंख्य फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या सिनेतारकासुद्धा सकाळी आरशात बघताना आपल्यासारख्याच, रंगवलेल्या केसातून डोकावणारा तो एक पांढरा केस बघून खट्टू होत असतात, हे मात्र आपल्या कधीच लक्षात येत नाही.
हेच जर फोन उचलून किंवा त्याहीपेक्षा चांगले, प्रत्यक्ष भेटून, आपल्याला ज्यांचा हेवा वाटतो त्यांची चौकशी केली असता असे लक्षात येते की तेही आपल्यासारखीच कशाशीतरी झुंज देत असतात. प्रत्यक्ष भेटून बोलताना, संवादातील शिष्टाचारही पाळला जातो. आणि हल्ली दुर्लक्षित झालेल्या संवादातील श्रोत्याच्या भूमिकेतही आपल्याला जाता येते. वेळ वाचवणारी कितीही तांत्रिक उपकरणे आणि ऍप्स आपल्या हाताशी आली तरीही कित्येकांना वेळ कमीच पडतो अशी त्यांची तक्रार असते. पण हातातल्या मोबाईलला आपण जितका वेळ देतो, त्याच्या दहा टक्के वेळ जरी आपण खऱ्या खुऱ्या माणसांना भेटण्यासाठी दिला, तरी या मायाजालातून बाहेर येऊन थोडावेळ, आपल्या आयुष्याकडे लांबून बघायची संधी आपल्याला मिळू शकते. आणि असे बघितले असता लक्षात येते की प्रत्यक्ष भेटून मिठी मारण्याची, हातावर टाळी देऊन फिदीफिदी हसण्याची, कटिंग चहा पीत राजकारणावर चर्चा करण्याची मजा कमी झालेली नाही.