Monday, October 3, 2016

पिंक -- रिफ्लेक्शन

१. तू लग्नानंतर सुद्धा नोकरी/व्यवसाय चालू ठेवणार का?
२. घर सांभाळून काय करायच्या त्या नोकऱ्या करा
३. अगं काहीही काम करत नाही ती घरात. सगळ्या कामांना बायका लावून ठेवल्यात.
४. हल्ली काय पाळणाघरात टाका मुलांना की ह्या मोकळ्या नोकऱ्या करायला.
५. टिकली लाव. मंगळसूत्र घाल. सौभाग्यवती आहेस ना तू? दिसायला नको?
६. असंच असतं. कामावरून उशिरा येते आणि मग नवरा यायच्या आधी फोनवरून जेवण मागवते. पैसा आहे ना हातात!
७. हल्ली तर काय रस्त्यात उभ्या राहून मुलीदेखील सिगारेटी ओढायला लागल्यात. मुलांबरोबर ड्रिंक्स घेतात. निर्लज्ज!
८. आमच्या सुनेला तर काहीही येत नव्हतं. स्वयंपाकघरात जायची वेळच आली नसेल कधी.
९. अहो माझा मुलगा रोज हिला हातात नाश्ता देतो! आणि मग ही जाते ऐटीत ऑफिसला. बिचारा बाई अली नाही तर भांडी पण घासतो.
१०. तुम्ही इतक्या उच्च पदावर पोहोचलात. हे तुम्ही पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळून कसं केलं?
११. तू लग्नानंतर आडनाव बदललं नाहीस?
तुम्ही ओळखलं असेल की हे सगळे प्रश्न किंवा कॉमेंट्स बायकांना विचारले जातात किंवा त्यांच्याबद्दल केल्या जातात. पण आता एक गंमत म्हणून आपण हे सगळे प्रश्न किंवा टिप्पण्या एखाद्या पुरुषाला डोक्यात ठेऊन करू. एखाद्या मुलाला एखाद्या मुलीनी लग्नाआधी जर, "तू लग्नानंतर नोकरी करणार का?' असा प्रश्न विचारला तर तो विनोद ठरेल. नोकरी (आणि पगार) ही मुलाची लग्नाची (आणि कधी कधी हुंड्याची) लायकी ठरवते. तीच जर त्याला सोडावी लागली तर काय उपयोग. एखाद्या सासूनी आपल्या जावयाबद्दल चार चौघात, "याला काहीच स्वयंपाक यायचा नाही लग्नात. सगळं मी शिकवलं", असे उद्गार काढले तर कसं वाटेल? पुरुष घरातून बाहेर पडताना कधी "आपलं लग्न झालय" हे दाखवायला टिकली मंगळसूत्र घालून जातात का? रस्त्यात असंख्य ठिकाणी पुरुष मजेत सिगारेट ओढताना दिसतात. तंबाखू स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक करते का? दोघांनाही ती तितकीच घातक आहे. पण एखाद्या स्त्रीने सिगारेट ओढली की ती तिच्या आरोग्याचा नाही तर चारित्र्याचा निकष बनते. इंद्रा नूयी सारख्या महिलेला हमखास तुम्ही घर सांभाळून हे कसं जमवलं हा प्रश्न विचारला जातो. पण सुंदर पिचाईचं देखील घर कुणीतरी सांभाळत असतं म्हणून तो निर्धास्तपणे गूगलचा सीईओ होतो. पण स्त्रीला मदत करणाऱ्यांची (विशेष करून सासरच्यांची) नावे आणि त्यांच्याप्रती त्या स्त्रीला असलेली अपार कृतज्ञता ही त्या काळ्या शाईत उमटलीच पाहिजे.
आपल्या समाजातील या आणि अशा कितीतरी ढोंगी रूढींना पिंक हा सिनेमा वाचा फोडतो. पिंक खरंतर एका ठराविक विषयाभोवती फिरतो. तो म्हणजे स्त्रीने पुरुषाला कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास दिलेली अनुमती. ती अनुमती तिच्या कपड्यांमधून, तिच्या सवयी बघून, तिचे किती मित्र आहेत आणि ते "तसे" आहेत का हे बघून, तिनी आधी हे (कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर) अनुभवलंय म्हणून, अशा आणि यासारख्या इतर कुठल्याही कारणांनी परस्पर मिळत नाही. आणि स्त्री नाही म्हणत असताना तिच्याशी कुठल्याही मार्गाने (यात मानसिक ताणही आहे) ठेवलेले संबंध हे शोषणच आहे. तसंच तिनी आधी दिलेल्या आणि काही कारणांनी परत घेतलेल्या अनुमतीला डावलून तिच्यावर जबरदस्ती करणे हेदेखील शोषण आहे.
दिल्लीत एका घरात रूममेट्स म्हणून राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलींची ही गोष्ट आहे. ओळखीच्या मुलाच्या मित्रांबरोबर रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी त्या जातात आणि त्या रात्री जे घडते त्याचा पोलीस कम्प्लेंट कोर्टकचेरीपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवलाय. अमिताभ बच्चन यांचा अभिनय या चित्रपटाचा कणा आहे. त्यांचे बोलके डोळे, संयमित अभिनय आणि दमदार आवाज यांच्या जोरावर आधीच चांगलं असलेलं कथानक उत्कृष्ट बनून जातं. हा सिनेमा बघताना पुन्हा पुन्हा जाणवतं की अभिनय कंट्रोल केल्यानी त्याचा परिणाम सगळंच व्यक्त केल्यापेक्षा कितीतरी जास्त होतो. पण तो कसा कंट्रोल करायचा हे अमिताभ बच्चनच जाणे! तापसी पन्नू आणि इतर मुली यांचा अभिनयदेखील वाखाणण्याजोगा आहे.
या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की बाहेर आल्यावर त्यावर बराच वेळ विचार केला जातो. आणि विषय जरी बलात्कार किंवा विनयभंगापुरता मर्यादित असला तरी तिथपर्यंत जाण्यात समाजच कारणीभूत आहे हे पुन्हा पुन्हा जाणवतं. सिनेमात तापसी पन्नू पोलिसात कम्प्लेंट करायला जाते तो सीनदेखील सिनेमागृहातील लोकांच्या मानसिकतेचा आरसा बनतो. पोलीस तिला तिनी कम्प्लेंट कशी करू नये आणि त्याचे कसे तिच्यावरच वाईट परिणाम होतील हे समजावू लागतात. आणि तसं करत असताना अतिशय निर्लज्जपणे वेगवेगळी उदाहरणे देऊन (तिच्या मैत्रिणीला "एक्सपीरियन्सड" संबोधून ) तिला तो परावृत्त करताना दाखवला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो.
पिता रक्षति कौमार्ये, पती रक्षति यौवने ।
पुत्रो रक्षति वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ।।
स्त्री आपली आई, बहीण किंवा बायको असेल तर तिची रक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे, या "पारंपरिक" विचारातून स्त्री स्वत:चे रक्षण करू शकत नाही आणि तिचे रक्षण करणारा पुरुष नसेल तर ती आपली मालमत्ता होते इथपर्यंत आपण कधी पोचलो हे विचार करण्याजोगे आहे. याही पुढे जाऊन जी स्त्री स्वतंत्रपणे जगू इच्छिते तिचा द्वेष करण्याची सुद्धा परंपरा आपल्यामध्ये आलेली आहे. आणि या मोठ्या मोठ्या अपराधांना सुरुवात करून देणारे छोटे छोटे किस्से असतात जे लहानपणापासून पुरुष बघत असतात. यातील पहिला संस्कार म्हणजे आपल्या सुनेच्या किंवा बायकोच्या पोटातील जीव पुरुष असावा यासाठी केलेला धार्मिक, शारीरिक आणि तांत्रिक अट्टाहास. आणि दुःखाची गोष्ट अशी की या अट्टाहासात स्त्रियादेखील भाग घेतात. स्त्रियांना मुली (नाती) नको असणे हे आपल्या समाजाचे सगळ्यात मोठे अपयश आहे. आणि मुलींना सबळ केल्याने मुलांवर आलेल्या अवास्तव अपेक्षा कमी कारण्यासदेखील मदत होईल. एखाद्या पुरुषाला घरी बसून आपल्या मुलांची काळजी घेणे जास्त प्रिय असेल तर त्याला ते करायचीही मुभा मिळाली पाहिजे.
हे बदलायचे असेल तर काही सुभाषितांना निवृत्त करून नव्याने सामाजिक घडी बसवली पाहिजे. आणि पिंक सारखे चित्रपट बनतायत आणि आवर्जून बघितले जातायत यातच तिची सुरुवात आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर पाहावा असा चित्रपट आहे.