Friday, May 11, 2012

बोळका रावण

२०१० मध्ये रावण नावाचा सिनेमा काढण्यात आला होता. त्यात श्री. सौ ऐश्वर्या राय यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच्या मुलाखाती बघून मी तो सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला. (ऐश्वर्याला एक मिनिट षोडशवर्षीय मुलीसारखं खिदळायचे किती मिळतात हो?). पण या चित्रपटाचं संगीत आमच्या लई लई फेवरेट रेहमानने दिलं असल्यामुळे गाणी मात्र आम्ही आवर्जून ऐकली. अधून मधून नेहमी रेहमान प्लेलीस्टमध्ये "बेहने दे", "रांझा रांझा" झालाच तर "बीरा" ही गाणी येतात. पण परवा अचानक  बीरा या गाण्यात कलक्यूलेशन मिस्टेक आहे असं माझ्या निदर्शनास आलं.
तर गाण्याचे बोल असे आहेत :
बीराऽऽ बीरा बीऽऽरा, बीरा बीरा, बीरा बीरा बीरा (वाचकांनी इथे हे गाणं उघडून ऐकणं अपेक्षित आहे)
बीरा के दस माथे, बीरा के सौ दांत !!
आता दस माथे म्हंटल्यावर सौ दांत कसे बरं? लगेच कुठल्या गाढवानी गाणं लिहिलं म्हणून गुगल केलं तर गुलझार! 



रेहमानप्रमाणेच गुलझारवर देखील माझा जीव आहे. मग मी त्याचं समर्थन करायचा प्रयत्न केला. खरं तर दस माथे म्हणजे एकूण तीनशे वीस दात. अगदी आपण भारतीय रामभक्त म्हणून, "रावणाला अक्कल नव्हती", असं म्हंटलं तरी दोनशे ऐंशी तरी असायला पाहिजेत. त्यामुळे सौ अगदीच कमी आहेत. मग मी असा विचार केला की कदाचित रावण काहीच तोंडं जेवायला आणि बोलायला वापरात असेल. त्यामुळे तीन तोंडांना नीट दात आणि बाकी तोंडं बोळकी असा रावण डोळ्यासमोर उभा केला तर टचकन डोळ्यात पाणीच आलं. एवढ्या लंका सम्राटाला बोळकी तोंडं का म्हणून हो. शत्रू पण कसा रुबाबदार पाहिजे. बोळक्या रावणाला हरवण्यात रामाचं "माचोपण" कमी होईल ना. आणि सीतेचं पतीव्रतदेखील तेवढं इनटेन्स वाटणार नाही (काय हल्लीची पिढी ही! राम माचो म्हणे आणि इन्टेनसीटी ऑफ पतीव्रत?). मग असाही विचार केला की रावणाचे सगळे दात लढाईत पडले असतील. पण दात पाडणारी लढाई म्हणजे अगदीच कुस्ती वगैरे वाटते. रावण वज डेफीनेटली  बेटर द
ॅट! माझ्या डोळ्यासमोर छान झुपकेदार मिशावाला, रसिक, कवी रावण आहे. "रम्य ही स्वर्गाहून लंका" म्हणणारा. तो काही कुस्ती बिस्ती खेळणार नाही. मग ते सौ दात सरासरी दहा असे सगळ्या तोंडात घातले. पण विरळ दातांचा रावण बोळक्या रावणापेक्षाही जास्त केविलवाणा दिसू लागला. 

हे दाताचं गणित मांडताना माझ्या अचानक असं लक्षात आलं की मला रावणाबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, आणि थोडा आदरदेखील. असं माझ्या आयुष्यात काय घडलंय ज्यामुळे मला रावणाबद्दल अशा भावना असाव्यात? या विचारांनी माझं मन व्यापून गेलं. जगातल्या सात्विक आणि तामसिक शक्तीचं अचूक अधोरेखन झालं पाहिजे असा आग्रह या भावनेमागे आहे की माझ्यातला रावण? आणि काय फरक पडतो? ऐक नं गप गाणं! एवढा उहापोह कशापाई? हेच चुकतं तुझं. तू सगळं ओव्हर अनलाइज करतेस. काही काही लोक कसे काहीही विचार न करता या टोकापासून त्या टोकापर्यंत जातात. तुझ्या या अतिविचारानीच तुझ्या आयुष्यातले सगळे पेच तयार झालेत. अतिविचार आणि अविचार ही एकाच असहायतेची दोन रूपं आहेत. हे जाण आणि मनावर ताबा ठेव.
या आणि अशा अनेक विचारांच्या खोल गर्तेत पडता पडता मी एकदा स्वत: बरोबर आकडा घालून ते गाणं म्हणायचं ठरवलं. 


बीराऽऽ बीरा बीऽऽरा, बीरा बीरा, बीरा बीरा बीरा
बीरा के दस माथे, बीरा के तीन सौ बीस दांत !!
ते म्हणताना माझ्याच  तोंडात कुणीतरी ज्यादा दात घातलेत असं वाटलं. मग लक्षात आलं मीटरचा प्रॉब्लेम आहे. मग माझ्या मनात तमिळ मधून हिंदीमध्ये त्याच चालीवर गाणं अनुवादित करणा-या गुलझारसाठी मायेचा पूर दाटून आला. थोडावेळ माझ्या डोक्यातल्या त्या दुष्ट शास्त्रज्ञानी ब्रेक घेतला. फारच हायसं वाटलं. एखाद्याबद्दल मनापासून प्रेम वाटायला लागलं की त्यांच्या दुर्गुणांची गोळाबेरीज करता येत नाही. प्रेमात ती फार मोठी शक्ती आहे. पण प्रॉब्लेम असा आहे (आहेच का परत?) की प्रेम, यु नो, इज व्हेरी टेम्पररी. लाईक अ चंचल हरीण इफ यु विल (असंच एक चंचल हरीण रावणानीदेखील वापरलं होतं! आम्ही पण महाभारत वाचलंय बरंका!).


 जर प्रेम किती तरल आणि अत्तरवजा आहे ही देवदासाला कळलं असतं तर शाहरुखला त्या रूपात बघायची वेळ आपल्यावर आली नसती. इकडच्या व्हली गर्ल्सना जर देवदास ऐकवला तर त्या त्यांच्या घशाच्या कुठल्याश्या दरीतून निघणा-या त्या आवाजात, "ही वझ लाईक, सो लाईक टोटली अ लूझर" म्हणतील. एकूणच आता सगळीकडे प्रेम जुनं झालंय. त्यामुळे गुलझारबद्दल मला वाटणारं प्रेमदेखील उडून गेलं आणि परत ते शंभर दात मला चावू लागले.
शेवटी एक अगदी सोप्पा मार्ग निघाला. जेव्हा जेव्हा मला ते गाणं ऐकावसं वाटतं, तेव्हा मी ते तमिळमध्ये ऐकते. आणि मला तमिळ येत नाही आणि मी कधीही तमिळ शिकणार नाही या आनंदी भरवश्यावर मी माझ्या दुष्ट, कटकट्या आणि चिकित्सक मनाशी तडजोड केली. :)

Monday, April 9, 2012

देनिस, कॅल्विन आणि निकोला


 कधी कधी मनाची मरगळ घालवण्यासाठी मी लहान मुलांची पुस्तकं वाचते. लहान असताना मला आजी नेहमी अरेबियन नाईट्स वाचून दाखवायची. त्यातला ठेंगू कुबड्या, ताटलीएवढ्या मोठ्या डोळ्याचा कुत्रा, जादूचा दिवा आणि त्यातून येणारा अक्राळ विक्राळ जिनी या सगळ्यांनी माझ्या मनात जणू एक सिनेमा उभा केला होता. तसंच इसापनीती, पंचतंत्र, अकबर आणि बिरबल या सगळ्या गोष्टीदेखील लाडक्या असायच्या. पण थोडी मोठी झाल्यावर जेव्हा मी स्वत: पुस्तकं वाचू लागले, तेव्हा मात्र मला मुलांसाठी लिहिलेल्या या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींपेक्षा, मुलांच्या आयुष्याबद्दल, मोठ्या माणसांनी, लहान मुलांच्या शब्दात लिहिलेल्या गोष्टी जास्त आवडू लागल्या.

यातलं मी कधीही न विसरू शकणारं उदाहरण म्हणजे देनिसच्या गोष्टी. देनिस हा साधारण सहा वर्षांचा रशियन मुलगा आहे. देनिस त्याच्या आई बाबांबरोबर सोविएत राजवटीतल्या काळातील रशियात राहतो. त्याचे आई बाबा, त्याचा मित्र मिष्का, मैत्रीण अनुष्का ही पुस्तकातली मुख्य पात्रं आहेत. हे पुस्तक वाचताना पहिल्यांदा विक्तर द्रागुनस्की हा मोठा माणूस आहे यावरच विश्वास बसत नाही. पुस्तकातली प्रत्येक कथा कुठल्याही सहा वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात घडू शकणारी आहे. माझी आवडती गोष्ट "बरोब्बर पंचवीस किलो". देनिस आणि मिष्का जत्रेत जातात. तिथे  एका खेळात, बरोब्बर पंचवीस किलो वजन असलेल्या मुलाला किंवा मुलीला बक्षिश मिळणार असतं. देनिसचं वजन पंचवीस किलोच्या जरा वर भरतं तर मिष्काचं पंचवीसच्या थोडं खाली! मग देनिस मिष्काचं वजन बरोब्बर पंचवीस किलो भरेपर्यंत त्याला लिंबू सरबत प्यायला लावतो.


 यातल्या काही गोष्टी नुसत्या मजेदार नसून थोड्या अंतर्मुख करायला लावणा-या आहेत. जेव्हा देनिसला छोटी बहिण होते, तेव्हा त्याच्या मनात तयार झालेलं छोटसं वादळ, सर्कशीत चेंडूवर चालणारी सुंदर मुलगी पाहून त्याला तिच्याबद्दल वाटणारं कौतुक/ आकर्षण, या सगळ्या हळुवार गोष्टी एखाद्या सहा वर्षाच्या मुलाच्या भाषेत लिहिण्याची प्रचंड प्रतिभा या पुस्तकात दिसते.


अमेरिकेतही असा एक लाडका सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव कॅल्विन. कॅल्विन आणि हॉब्स ही कॉमिक स्ट्रिप १९८० - १९९० च्या सुमारास अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध झाली. कॅल्विनचे जनक बिल वॉटरसन हे ओहायो मधल्या कडाक्याच्या हिवाळ्यात लहानाचे मोठे झाले. त्यामुळे कॅल्विनच्या बाललीलांमध्ये बर्फाची माणसं बनवणं हा एक महत्वाचा उपक्रम आहे. कॅल्विनचा या सगळ्या खोड्यांतील सवंगडी म्हणजे हॉब्स -- त्याचा खेळण्यातला वाघ. हॉब्सचं वैशिष्ठ्य असं की  कॅल्विनच्या डोळ्यांना तो खराखुरा जिवंत वाघ दिसतो पण चित्राच्या पॅनेलमध्ये दुसरी कोणतीही व्यक्तिरेखा आली की हॉब्स निर्जीव खेळणं बनतो. ही कल्पना अत्यंत नाजूक आहे. आणि ती इतक्या जाणीवपूर्वक लोकांसमोर मांडणं फार अवघड आहे. पण आपल्या स्वत:च्याच लहानपणात डोकावून पाहिलं तर असे किती काल्पनिक सवंगडी सापडतील? लहान मुलांना काल्पनिक सवंगडी असू शकतात हे मोठं झाल्यावर समजणं (किंवा आपल्या लहानपणातून लक्षात राहणं) हीच कवीमनाची पहिली पावती आहे.



देनिसप्रमाणेच कॅल्विनचं आयुष्यदेखील कुठल्याही सहा वर्षांच्या मुलासारखं आहे. पण वॉटरसनकडे मोठ्यांनादेखील नीटसं न स्पष्ट करता येणारं तत्वज्ञान छोट्या कॅल्विनच्या तोंडी घालण्याचं कसब आहे. कॅल्विनच्या काही विनोदांतून वॉटरसनचं स्वत:चं निसर्गप्रेम, पशुप्रेम दिसून येतं. अर्थात, या स्ट्रिपमध्ये कॅल्विनला कुठेही कम्प्यूटरची बाधा झालेली दिसत नाही. सतत टी.व्ही बघायच्या त्याच्या हट्टालादेखील घरून शांतपणे विरोध केला जातो. आणि त्याच्या आई वडिलांची त्याला घरातून बाहेर खेळायला हाकलण्याची तळमळ आजच्या काळात जास्त उचलून धरली जाईल. एका स्ट्रिप मध्ये घरात मलूल चेह-यानी टी.व्ही बघणा-या कॅल्विनला हॉब्स सूर्यप्रकाश न मिळालेल्या फुलाची उपमा देतो. अशा छोट्या छोट्या कल्पनांमधून वॉटरसन मुलांनी बाहेर भटकावं, आणि त्यांना लहानपण तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम न होता घालवता यावं, याचे मनाला भिडणारे धडे देतात.


फ्रांसमधल्या सहा वर्षांच्या मुलाचं नाव निकोलस (निकोला) आहे. अस्टेरीक्सचे लेखक गॉसिनी आणि जॉ-जॅक सॉम्पे या दोन प्रतिभावंत चित्रकारांच्या सहयोगातून या पुस्तकांचा जन्म झाला. निकोलाचं आयुष्य १९६० च्या आसपासच्या फ्रांसमधून आलेलं आहे. त्याच्या शाळेतले मित्र, त्याचे चिडके शिक्षक (ज्यांना मोठा बटाटा असं नाव व्रात्य कारट्यांनी बहाल केलं आहे), निकोलचे आई बाबा अशी या पुस्तकांमधली "पात्रावळ" आहे. या पुस्तकांची खासियत म्हणजे अगदी लहान मुलं जशी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतात, तसेच या पुस्तकात पुन्हा पुन्हा तेच तेच रेफरन्सेस येतात. निकोला स्वत: या गोष्टी सांगतो त्यामुळे तो प्रत्येक पात्राची पुन्हा नव्याने ओळख करून देतो (जसं की "माझा मित्र अॅलेक -- जो सारखा खात असतो"). या पुस्तकात निकोलाच्या आई बाबांची त्याच्या आईच्या आईवरून होणारी भांडणंदेखील मजेदार आहेत. (जागतिक) "घरो घरी मातीच्या चुली"चा छान प्रत्यय येतो. पण या पुस्तकांची सगळ्यात सुंदर बाजू म्हणजे सॉम्पेची रेखाटनं. त्यांनी रेखाटलेली शाळेची इमारत ही इतकी बोलकी आहे की तिच्यात कुठल्याही देशातल्या मुलाच्या/मुलीच्या मनाला थेट त्यांच्या शाळेत घेऊन जायची ताकद आहे.

भारतात प्रथम बुक्स ही संस्था खास लहान मुलांच्या साहित्यासाठी काम करते. भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये दर्जेदार बालसाहित्य अनुवादित करायचा उपक्रम प्रथम बुक्सने हाती घेतला आहे. माझ्या नशिबाने मला यातील एका पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करण्याची संधी मिळाली. आणि हा अनुवाद करताना, लहान मुलांना समजेल, आवडेल अशा इंग्रजीत, मराठीतले गोंडस शब्द तितक्याच गोंडसपणे अनुवादित करणं फार म्हणजे फार कठीण गेलं. पण ते करताना अतिशय आनंद मिळाला. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं (लिंक). माधुरी पुरंदरेंनी लिहिलेलं बाबांच्या मिशा! विशेष म्हणजे या पुस्तकातली सगळी चित्रं देखील त्यांनीच काढली आहेत.
देनिस, कॅल्विन, निकोला आणि माधुरीच्या पुस्तकातली अनु या सगळ्या मुलांचे आनंद एकसारखे आहेत. आणि सोविएत बर्फात काय नाहीतर कॅपिटॅलिस्ट बर्फात काय, स्लेडवर बसून घसरगुंडी खेळण्यात येणारी मजा एकसारखीच! आणि विविध भाषांमधून या लहान मुलांच्या गोष्टी ऐकताना अबालवृद्धांना होणारा निरागस आनंदही एकसारखा. :)

Thursday, April 5, 2012

रहस्य चिंतामणी

चिता आणि चिंता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे असं मला माझ्या आजीनी फार लहानपणीच सांगितलं होतं. अर्थात माझ्या आजीनी स्वत: चिंतेत पीएचडी केली होती हे सांगायला नको. आजोबादेखील त्याच वर्गवारीतले. मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. तो प्रवास मी एकटीने केला. पण मी मुंबईहून कॅलिफोर्नियाला पोहोचेपर्यंत माझ्या बाबाला एकीकडे बायको आणि दुसरीकडे सासरेबुवा असा चिंता टेनिसचा सामना बघावा लागला होता. आईदेखील भयंकर चिंता करते. आमच्या घरात वारसाहक्काने चिंता दिली जाते. मी अगदी लहानपणीपासूनच खूप चिंता करायचे. लहान असताना आईला यायला उशीर झाला की मला तिला अतिरेक्यांनी पकडून नेलंय अशी (ती परत येईपर्यंत) खात्री असायची. मग मी दरवाज्यात भोंगा पसरून बसायचे. बाबामुळे आपल्याला शाळेला पोहोचायला उशीर होईल या चिंतेतदेखील मी कैक सकाळी वाया घालवल्या. गणितात नापास होण्याची चिंता तर मी अजूनही करते. एकूणच नापास होण्याची चिंता ही माझ्या आयुष्यातील महाचिंता आहे. पण चिंता करणा-या लोकांचा एक गुण असा आहे की ते इतर चिंतामाणींना अगदी ठामपणे चिंतेवर मात करायचे उपाय सुचवू शकतात. आणि  "मला हे आयुष्यात खूप उशिरा कळलं म्हणून मी तुला सांगते", असंही असतं वरती.

ध्यान करणे (मराठीत मेडीटेशन) हा चिंतेवर जालीम उपाय आहे असं मला लहानपणापासून सांगण्यात आलं होतं. ध्यान करायचा पहिला प्रयोग मी चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात केला. तो अत्यंत असफल झाला हे सांगून काम होणार नाही. ध्यान करायच्या शिशुगटात जाण्याऐवेजी मी सरळ पीएचडीला बसले. दोन तास वेगवेगळे अवयव ढिले करत काय झालं पुढे काही समजलं नाही. अचानक एका फिरंगी तरुणीने "उठ आणि घरी जाऊन झोप" असं हलवून सांगितलं. उठल्यावर आजूबाजूचे इतर लोक तजेलदार झालेले दिसले. मी मात्र रात्री जास्त झालेल्या हवालदारासारखी उठले. माझं ते ध्यान बघून आजूबाजूच्या लोकांची चांगली करमणूक झाली असावी. मग आता यापुढे घरी सराव केल्याशिवाय अशा वर्गांना जायचं नाही असा मी पण केला. मग चिंतेवर मात करण्यासाठी मी सगळ्या प्रकारच्या ध्यानधारणेचा अभ्यास करू लागले.

फिरंगी लोक भारतीय संस्कृतीचं फिरंगायझेशन करण्यात तरबेज आहेत. जरा गुगलवर टिचकी मारली आणि माझ्या आजूबाजूला किती फिरंगी भारतीयांचा बुजबुजाट आहे हे लगेच माझ्या लक्षात आलं. ध्यान करणं उत्तम पण त्याजोडीला योगासनं करावीत असा मतप्रवाह दिसला. म्हणून मी आधी योगासनांच्या वर्गात गेले. भारतात मी दोनच प्रकारचे योगा असतात असं बघितलं होतं. पहिला प्रकार म्हणजे आजी योगा. हा प्रकार मी लहानपणी सकाळी उठल्या उठल्या आजीबरोबर करायचे. आणि दुसरा प्रकार म्हणजे छळ योगा. हा प्रकार सकाळी साडेपाचला उठून मी आई बाबांचे टोमणे झेलत करायचे. आमच्या ओळखीत एक काका योगासनांचे क्लास घ्यायचे. मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी हे वर्ग सुरु केले होते. त्यामुळे योगासनं म्हणजे दर दहा मिनिटांनी बारा सूर्यनमस्कार असं मला वाटायचं. असे सूर्यनमस्कार घालून घरी आल्यावर बोलायचीही शक्ती राहायची नाही.

पण ऑस्ट्रेलियात "हाथा" योगा, "विन्यासा" योगा, "अष्टांगा" योगा, "कुंडलिनी" योगा, झालच तर "हॉट" योगा आणि पावर योगा असे विविध प्रकार ऐकायला मिळाले. माझे पुण्यातले योगा काका कधीही मृदु आवाजात,"कनेक्ट टु युवर इनर पीस" वगैरे म्हणायचे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची योगासनं करायला मला फार मौज वाटू लागली. त्याच दरम्यात भारतात करीना कपूर पावर योगा करून हडकुळी झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून मला योगासनं करायची सवय लागली. ती सवय अजूनपर्यंत नशिबानी टिकून आहे.

दुस-यांसमोर इज्जतीचा फालुदा होऊ नये म्हणून मी मेडिटेशनची पॉडकास्ट ऐकू लागले. सुरुवातीला वातावरण निर्मितीसाठी मी भारतीय सुगंधाच्या उदबत्त्या लावून, भारतीय रजई अंथरून पद्मासन घालून ध्यान करायला बसायचे. मग एक एक सूचना ऐकून त्याप्रमाणे मनाला वळवण्याचा प्रयत्न करायचे.
श्वास आत कसा जातो, बाहेर कसा जातो याचं निरीक्षण करता करता कधी कधी माझं विमान भलतीकडेच उडू लागायचं.

म्म..आता मला माझं हृदय ऐकू येतंय..कसं ना! हृदय कायम चालू असतं. कुणी डिझाईन केलं असेल? असे पंप जर मनुष्य प्राण्याला बनवता आले तर सर्विसिंग नाही काही नाही! भारी.
शू!! चला आता परत ध्यान.
श्वास आत श्वास बाहेर. एक, दोन, तीन, चार..
जेवायला काय बरं करावं? किसलेल्या कोबीची कोशिंबीर? नको. कंटाळा आलाय डांएट करायचा. माझ्याच बाबतीत देवानी असं का केलं? कितीतरी लोक काय वाट्टेल ते खाऊन हडकुळे राहतात. माझ्याच नशिबी वजनवाढ का?
श्या. परत लिंक तुटली. श्वास आत, बाहेऽऽऽर! एक, दोन, तीन ..
कसला आवाज आहे हा? फ्रीज वाजतोय. कमाल आहे. हे जागेपणी कधीच लक्षात येत नाही. कशानी बरं वाजत असेल फ्रीज? शी! आणि टीप टीप काय आवाज येतोय? मला नळ गळलेले अजिबात आवडत नाहीत. बंद करावा का नळ? त्यापेक्षा टीप टीप तालावर श्वास घेऊया.
शुश! श्वास आत बाहेर. एक, दोन, तीन...


काही दिवसांनी या अशा फुटकळ ध्यानधरणेच्या जोडीला पॉझीटीव थिंकिंग सुरु केलं.
क्षमा, दया, शांती वगैरे जुन्या मराठी सिनेमातल्या नट्यांची जोपासना करायला सुरुवात केली. वाटतं खरं, पण या सगळ्या सात्विक विचारांनी अगदी दमायला होतं. मग कधी कधी माझं मन बुद्ध धर्माची ही कैद फोडून वाट्टेल तसा गोंधळ घालू लागायचं. लहानपणी एकदा आम्ही मांजराला कपाटात कोंडून ठेवायचा एक खेळ सुरु केला होता. त्यात अर्धा तास कपाटात कोंडलेलं मांजर बाहेर आल्या आल्या दिसेल त्या पहिल्या व्यक्तीला बोचकारायचं. तसंच माझं मनही या सात्विक विचारांच्या पिंज-यातून बाहेर आल्यावर दिसलेल्या पहिल्या व्यक्ती अगर वस्तूला नांगी मारायचं. मग काही दिवस मी त्याच्यावर संस्कार करायचे नाही. पण मग पुन्हा चिंताबाई सकाळच्या एसटीत बसून डोक्यात राहायला यायच्या. पुनश्च ध्यानधारणेचा निश्चय व्हायचा. पुन्हा उदबत्त्या बाहेर यायच्या.

हिंदू/बुद्ध धर्मात सांगितलेल्या पुनर्जन्माला सगळे नास्तिक पहिल्यांदा आरोपीच्या पिंज-यात उभं करतात. पण अशी किती वर्तुळं पुन्हा पुन्हा आपल्या एकाच आयुष्यात येत असतात. आणि अशी कित्येक छोटी वर्तुळं छेदून आपल्या आयुष्यातले छोटे छोटे मोक्ष आपल्या वाट्याला येत असतात. चुकांचे, चिंतांचे, संभ्रमाचे, आसक्तीचे असे कित्येक  पुनर्जन्म या एकाच आयुष्यात पाहायला मिळतात. आणि  दोन विचारांमधल्या त्या रिकाम्या जागेला लांबवण्यातच ध्यान करायची पहिली छोटी पायरी लपलेली असते. पण त्या जागा पकडायला नक्की मनाला चपळ बनवावं की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हेच कळत नाही. पण जेव्हा त्या जागा सापडतात तेव्हा अगदी नॅनो सेकंद का असेना, पण प्रार्थनेचं एक छोटंसं प्रतिबिंब आपल्या अंतरंगात दिसतं.

कधी कधी मनाला यशस्वीपणे गप्प बसवल्यावर आपण जेव्हा "मी" म्हणतो, तेव्हा आपण नक्की कशाला मी म्हणतो असा प्रश्न पडतो. मी म्हणजे अव्याहतपणे धडधडणारं हृदय आहे, माझ्या या जगातील अस्तित्वाला लय देणारा माझा वफादार श्वास आहे, की मला हे सगळं पुन्हा पुन्हा साठवून, गोठवून लिहायला लावणारं मन आहे? असे सुंदर, शांत विचार करताना जे मन माझी साथ देतं ते कधी कधी चिंतेच्या भोव-यात कसं काय अडकतं? आणि जसं माझ्या श्वासावर, हृदयावर मला बोट ठेवता येतं तसं माझ्या मनावर का बरं ठेवता येत नाही? आणि तरीही अदृश्यपणे माझ्या सगळ्या जाणिवांना, आनंदाला, चिंतेला आणि विचारला ते कसं काय स्वत:च्या काबूत ठेवतं?


Monday, March 26, 2012

कसल्या दु:खाने सुचते हे गाणे



दु:खाचे महाकवी ग्रेस यांचं नुकतंच निधन झालं. ही बातमी ऐकल्यावर माझं मन थेट 'ग्रेस' वाटेवर गेलं.
पहिल्यांदा ग्रेसचे शब्द कानावर पडले तेव्हा मी सहा वर्षांची होते. बाबाला निवडुंग या चित्रपटानी वेड लावलं होतं. त्यामुळे आमच्या घरात कायम 'तू तेव्हा तशी' नाहीतर 'घर थकलेले संन्यासी' ऐकू यायचं.
ग्रेस माझ्या मोठं होण्याचा एक छोटासा भाग बनले.
अर्थात याचं पाहिलं श्रेय बाबाला आणि नंतर हृदयनाथ मंगेशकरांना. त्यांच्या चालींविना ग्रेस इतक्या लवकर माझ्या वाचण्यात आले नसते. आणि कदाचित या दोन व्यक्तींच्या अप्रत्यक्ष सहभागाविना कधीच आले नसते.

ग्रेसच्या कवितेचं मला लक्षात आलेलं पाहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्या कवितांमध्ये एखाद्या तरल भावनेचा सूर लावून वातावरण निर्माण करायची प्रचंड ताकद आहे. अर्थात जेव्हा अशा कवितांना हृदयनाथ शोभेशी चाल लावतात तेव्हा ऐकणार्‍यांचं काम कमी होतं.
जशी त्यांची 'वार्‍याने हलते रान' कविता.
त्यात एक ओळ आहे --

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ
दिव्यांची नगरी

त्या कवितेचं संपूर्ण सूरच ओढाळ आहे. ती ऐकल्यावर एखाद्या प्रचंड मोठ्या मळ्यात, तिन्ही सांजेला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली एकटं बसल्याची भावना मनात निर्माण होते. ग्रेसच्या कवितांनी मला फार लहान वयात वैराग्यातील सौंदर्‍याचा परिचय करून दिला. एकटेपणाचा, अलिप्तपणाचा आणि विरक्तीचा एक अतिशय मुलायम सूर असू शकतो याची जाणीव मला ग्रेसच्या सगळ्याच साहित्याने करून दिली. माझ्या बालपणीचं दुसरं दैवत म्हणजे पु.ल. देशपांडे. त्यांच्या लेखनात ग्रेसच्या लेखनात सापडणारे  हे असे कमळाच्या पानावरील थेंबासारखे भाव,  नेहमीच्या आयुष्यातून शोधून काढण्याची कला होती. पुलंचा नंदा प्रधान ग्रेसच्या कवितेतून बाहेर आलेल्या एखाद्या शापित गंधर्वासारखा भासतो. पण या दोन्ही कलाकारांची कला एकाच काळात वाचता आल्याबद्दल मला कुणाचे आभार मानावे असा प्रश्न पडतो कधी कधी.
बरेच वर्षं काहीही न समजता या कविता मी वाचल्या. आणि काही वर्षांपूर्वी अचानक एक एक कविता उमगू लागली. काही तशाच राहिल्या.
पण कवितेच्या अर्थापेक्षा सुंदरही कवितेत काय असू शकतं याची ओळख ग्रेसच्या काही कवितांमध्ये होते.

ही माझी प्रीत निराळी, संध्येचे श्यामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला, डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया, ओंजळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो, रातीरंगातील नि:संग
शपथेवर मज आवडती, गायींचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही, असणार कुठेतरी मूळ
आकाशभाकिते माझी, नक्षत्रकुळही दंग
देठास तोडतानाही, रडले न फुलाचे अंग!

ही सगळी कविता मला कशी पाठ झाली, का पाठ झाली आणी त्यातून मला काय अर्थबोध होतो हे मला अजूनही समजलेलं नाही. पण त्यांच्या कवितेतला प्रत्येक शब्द स्वत:चा कणा घेऊन येतो. त्याच्या अस्तित्वाला कवितेच्या आशयाची गरज नसते. आणी कधीतरी अचानक दोन विचारांच्या मधल्या रिकाम्या जागेत, कवितेला अर्थ फुटला, तरी तिची दिमाखदार शब्दसंपत्ती त्या अर्थापासून अलिप्त राहू शकते. ग्रेसची कविता अर्थासाठी नाहीच मुळी. आणि ती समजावून घेण्याचा आग्रहदेखील करत नाही. एखाद्या टपोर्‍या तजेलदार चांदणीसारखी ती स्वत:च्या शब्द सौंदर्‍यात मग्न आहे. तिच्याकडे आकर्षित होणारे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण तिच्यातून चांदण्यासारखे पसरलेले अगणिक अर्थ त्यांना अगदी लहान करून टाकतात. कदाचित तिच्या प्रेमात पडणार्‍या प्रत्येकाला ती वेगळी समजते. आणि मग त्यांच्या कवितेलाच जणू, "तू तेव्हा तशी" म्हणावसं वाटतं. कधी आपल्या आनंदी मनाचा ठाव घेत ती ऐल राधा बनते नाहीतर कधी चौफेर पसरलेल्या पाचोळ्यातून चालणारी पैल संध्या होते.


कधी कधी ती इतकी नाठाळ होते की ती ज्या वाटेवरून जाते तोच तिचा मार्ग हे मान्य करून शरणागती पत्करावी लागते. "नको ऐकूस बाई! तुला काय करायचंय ते कर" असं म्हणून सोडून दिलं तरी पुन्हा तिच्या मागून जावसं वाटतं. आणि असा बरोबर प्रवास केल्यावर कधीतरी, आपण हिच्याबरोबर चुकलोय की काय अशी भीती वाटू लागते. पण ती ज्या वाटेवर नेते, त्या वाटेवर हरवून जाण्यातदेखील खूप काही सापडल्याची भावना आहे.

अनुभवांच्या तोडमोडीला भिऊन, तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यासाठी पठडीचा आश्रय
मग प्रेषितांच्या व्याथासुत्रांचे काय?
शरणमंत्रांनी आणि मुल्ला मौलवींच्या पहाट गजरांनी आवाजाची दुनिया घटकाभर स्तब्ध होत असेल
पण ती हादरून जात नाही.
मंत्रांमागचे प्रेषितांचे अनुभव हेच खरे मार्गदर्शक असतात
पठडीबाज गुरूंच्या अश्रायानी मार्ग तर सापडत नाहीच, उलट दिशाभूल होत राहते
अशी दिशाभूल नाकारणे वा स्वीकारणे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न!
पण नाकारल्याशिवाय अस्तित्वाला हादरे बसत नाहीत, आणि हादरे बसल्याशिवाय काही नवनिर्माण होऊच शकत नाही
ही दु:खवैभवाची संपन्नता!



गौतम बुद्धाच्या प्रवासाचं वर्णन करणारी जरी ही कविता असली तरी ग्रेसच्या कवितेचाही प्रवास बुद्धाच्या प्रवासासारखाच होता. कुणा दुसर्‍याच्या अनुभवानी सिद्ध झालेल्या मार्गावरून ती गेली नाही. तिने स्वत:चा तयार केलेला मार्ग हा फक्त आणि फक्त ग्रेसच्या अनुभवांशी प्रामाणिक आहे. हा प्रामाणिकपणा त्यांच्या कवितेला एक वेगळंच लावण्य बहाल करतो.
ग्रेसच्या कवितेतून शिकायला मिळालेली अजून एक गोष्ट म्हणजे एखाद्या मानवी भावनेकडे चारी बाजूंनी बघायची तिची सवय. ग्रेसच्या काही कविता वाचून असं वाटतं की या कवितेच्या मूळ भावनेला पुन्हा पुन्हा उकळून तिचा अर्क काढला असावा. आणी मग तो अर्क असा लीलया इकडे तिकडे सुगंधासारखा विखरून टाकला असावा. मत्सरावर बोट ठेवणारी ही कविता माझ्या खजिन्यात कायमची कैद झाली आहे :

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफडाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्णकळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीकप्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी --राधा
हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!


पुलंच्या गोष्टी वाचताना नेहमी असं वाटायचं की या अशा तरल भावना मला समजाव्यात म्हणून अंतू बर्वा नाहीतर नाथा कामत बनून आल्या आहेत. एखाद्या दिवशी देवानी सुट्टी घेऊन माणसाच्या रूपात यावं तसं पुलंचं साहित्य हसवता हसवता अचानक अंतर्मुख करून जायचं. पण ग्रेसची कविता समजण्यासाठी मात्र स्वत:च्या जडदेहातून थोडावेळ बाहेर पडून देवांच्या दुनियेत जावं लागायचं. अर्थात ते करण्यासाठी कष्ट करावे लागायचे यात वादच नाही. पण ग्रेस म्हणतात तसच:

काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळे.

त्यांच्या कवितेच्या चांदण्यात उजळून निघायचं असेल, तर जीवाला  जाळणे अपरिहार्य आहे.

सखीच्या मुलीला कसे काय द्यावे
उन्हांतील हे भव्य शब्दांगण?
इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो
स्वतः सावलीचा मुका साजण...

त्यांची कविता कितीही गूढ असली, अगम्य असली तरी आपल्या सगळ्यांना ग्रेसनी त्यांचं हे भव्य शब्दांगण देऊ केलं आहे.
माझ्या मनाची कित्येक दारं उघडून दिल्याबद्दल मी ग्रेसची कायम ऋणी राहीन.

Thursday, March 15, 2012

फॉर्म्युला काकू

लहान असताना नेहमी आयुष्य म्हणजे एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फॅक्टरी आहे असं वाटायचं. अजूनही वाटतं.
आमच्या ओळखीत एक काकू आहेत. त्यांचं नाव मी फॉर्म्युला काकू ठेवलंय. फॉर्म्युला काकू ना, सगळ्यासाठी फॉर्म्युले तयार करतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे एकशेएक फॉर्म्युले त्यांच्याकडे आहेत. त्यांची मुलं शाळेत नेहमी खूप अभ्यास करायची. कारण खूप अभ्यास करणे हा त्यांच्या फॉर्म्युल्यातील मोठा घटक होता. तो नेहमी न्यूमरेटरमध्ये जायचा. त्यामुळे जितका जास्ती अभ्यास, तितकं जास्ती यश. आणि यात फक्त खूप अभ्यास करून मागल्या वर्षीपेक्षा जास्त मार्कं मिळवायचे अशी अट नव्हती. खूप अभ्यास करून मागल्या वर्षी जो पहिला आला होता, त्याच्यापेक्षा जास्त मार्कं मिळवायचे. आणि मग त्यांच्या आजूबाजूला जमणार्‍या सगळ्या सवंगड्यांपेक्षा ती किती पुढे आहेत यांचे अडाखेपण असायचे. आणि अभ्यास पण कसा? तर आठवीपासूनच दहावीच्या प्रश्नपत्रिका कशा असतात ते तपासून, त्याच साच्यात बसणारा अभ्यास करायचा. अवांतर अभ्यास बारावी नंतर. आणि मैत्री सुद्धा अभ्यासू मुलांशीच करायची. कारण ढ मुलांशी मैत्री केली तर ती डिनॉमिनेटरमध्ये जायची. आणि त्यामुळे आयुष्यातील अंतिम यशात कपात व्हायची.
नाटक, वक्तृत्व, वादविवाद वगैरे असायचे फॉर्म्युल्यात पण त्यांच्या आधी अपूर्णांकातले, एका पेक्षा कमी असलेले कोएफीशीयंट्स असायचे. त्यामुळे या गोष्टी खूप जास्ती केल्यानी आयुष्यातील अंतिम यशात फारसा फरक पडायचा नाही. आणि नेहमी या क्षेत्रात पुढे असलेल्या मुलामुलींचा अभ्यासाचा आकडा दाखवून, अभ्यास कसा श्रेष्ठ आहे याचं उदाहरण देण्यात यायचं. अवांतर वाचन अभ्यासाच्या आकड्यानुसार न्यूमरेटर नाहीतर डिनॉमिनेटर मध्ये जायचं. पण आठवीनंतर ते खालीच असायचं. दहावीनंतर भाषाकौशल्याला सुद्धा खालच्या मजल्यावर धाडण्यात यायचं. आणि आठवी ते दहावी सायन्सला जाणं कसं महत्वाचं आहे यावर खूप प्रवचन व्हायचं. त्यामुळे फॉर्म्युला काकूंची मुलं फॅक्टरीच्या असेम्बली लाईनवर छान टिकून राहिली. प्रत्येक व्यंगचाचणीतून फॉर्म्युला काकूंची मुलं अगदी माशासारखी सुळकन पुढे जायची. अशी कांगारूसारखी उड्या मारत मारत फॉर्म्युला काकूंची मुलं कुठच्या कुठे गेली! आम्ही बघतच राहिलो. आम्हीपण होतो फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्या सवंगड्यांमध्ये. पण आम्हाला तसा फारसा भाव नव्हता. कारण आम्ही नेहमी त्यांच्या आलेखाच्या मुळाशी बरोब्बर पंचेचाळीस अंशाचा कोन करून उड्डाण करणार्‍या त्या लायनीच्या खाली, नाहीतर वर असायचो. जिथे आम्ही वर असायचो ना, ती क्षेत्रं फॉर्म्युल्यात खाली असायची. आणि वर असलीच तर नगण्य असायची.
मग जशी जशी स्पर्धा वाढू लागली, तसं अर्थातच आमच्यात आणि फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्यात असलेलं अंतर वाढू लागलं. फॉर्म्युला काकूंची मुलं नेहमी आमच्या पुढे असायची. आणि कधीही त्यांना भेटायला गेलं की आम्हाला सहानुभूतीपर भाषण मिळायचं. त्यात एकदा आयुष्यात अभ्यासातील यशाचा कसा कमी वाटा आहे यावर भाषण देताना, धीरुभाई अंबानींचं उदाहरण आम्हाला देण्यात आलं. मग अर्थात आमच्या नापास झालेल्या, दु:खी (पण चाणाक्ष) मनात असा विचार आला, की फॉर्म्युला काकू त्यांच्या मुलांना अंबानी व्हायला का नाही शिकवत? आणि कदाचित आपण इतके गटांगळ्या खातोय म्हणजे कधीतरी आपणही अंबानी होऊ शकू काय , अशीही एक सुखद शंका आली. पण फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात जोखीम पत्करणे हे भल्या मोठ्या लाल अक्षरात खालच्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावरच्या बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण कुठल्याही प्रकारची जोखीम घेणे म्हणजे काकूंचा फॉर्म्युला अस्थिर करण्यासारखं आहे. आणि यात त्या फॉर्म्युल्यातील इतर घटकांना तपासून बघण्याची जोखीमही धरलेली आहे. अशा प्रकारे फॉर्म्युल्याचा पाया अगदी पक्का करण्यात आलाय. फॉर्म्युला काकूंच्या गणितांनी बिल गेट्स किंवा अंबानीकडे नोकरी मिळवणे हे बिल गेट्स किंवा अंबानी होण्यापेक्षा जास्त यशस्वी मानलं जातं. याचं कारण म्हणजे फॉर्म्युला काकूंच्या स्पर्धेत अंबानी कुठेच येत नाहीत. कारण त्यांनी फॉर्म्युला काकुंचे सगळे नियम अगदी लहान वयातच झुगारून टाकले. पण याला फॉर्म्युला काकू नशीब असं गोड नाव देतात. आणि त्यांच्या मते नशीबवान नसणार्‍या माणसांनी अशी जोखीम पत्करू नये. आणि त्यांच्या मुलांनी मात्र काही झालं तरी पत्करू नये.
फॉर्म्युला काकूंची मुलं जेव्हा घासून, पुसून चकचकीत होऊन फॅक्टरीबाहेर पडली तेव्हा त्यांनी मोठ्ठा, हसरा श्वास घेऊन इकडे तिकडे पाहिलं. आणि त्यांचं यशस्वी फॉर्म्युला जीवन जगायला सुरुवात केली. पण आता करायला अभ्यास नव्हता आणि आजूबाजूला असलेली गर्दी वेगवेगळ्या क्षेत्रातून, देशांतून, भाषांतून आणि अनुभवांतून आली होती. त्यातील फॉर्म्युला काकुंसारख्या आयांची मुलं सोडता बाकी सगळ्यांनी वेगळेच मार्ग घेतले होते. काही जण फॉर्म्युला काकूंच्या मुलांपेक्षा लहान असूनही खूप पुढे गेले होते. काही जण खूप वेळा हरून आले होते. पण प्रत्येक तोट्याचा अभ्यास करून मस्त टगेपण बाळगून होते. काहीजण असं काही व्यक्तिमत्व घेऊन आले होते की फॉर्म्युला काकूंच्या लायनीच्या दोन्ही बाजूंचे लोक त्यांच्यामागून मंत्रमुग्ध होऊन चालू लागायचे. काही जण कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे. काही जण आयुष्यभर तपस्या करून निवडलेला मार्ग अचानक सोडून देणारे, आणि नवीन मार्गावर त्याहीपेक्षा वेगाने पुन्हा प्रगती करणारे. काही लोक फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात कणभरही नसलेल्या एखाद्या गुणावर आयुष्य बहाल करणारे. कुणी जैविक भाजीवाला, कुणी सात्विक खानावळवाला, कुणी लोकांच्या भिंती स्वत:च्या कल्पनेनी रंगवणारा असे अनेक यशस्वी लोक बघून फॉर्म्युला काकूंची मुलं पार भांबावून गेली. आणि आयुष्यातल्या लहान अपयशानेदेखील त्यांना कानठळ्या बसू लागल्या.
फॉर्म्युला काकूंच्या सगळ्या फुटपट्ट्या खर्‍या जगात तुलनेसाठी अपुर्‍या पडू लागल्या. कारण खर्‍या जगातील सगळी खरी माणसं काही फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली नव्हती. आणि जी फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली होती ती सगळी काहीतरी एकसारखं करत होती. पण फॉर्म्युला काकूंचा एक फॉर्म्युला मात्र खरा उतरला बरंका. त्यांच्या मुलांना खूप लवकर, खूप जास्ती पैसा मिळाला. लगेच काकूंनी त्यांना मिळालेला पैसा वाढवण्याचाही फॉर्म्युला दिला. आणि मग अभ्यासाची जागा पैशांनी घेतली.
फॉर्म्युला काकूंच्या सुना, जावई आणि मुलं यांनी इतर फॉर्म्युला दांपत्यांशी स्पर्धा सुरु केली. पण यामुळे काय झालं की फॉर्म्युला काकूंच्या मुलांसारख्या मुलांचा एक बुडबुडा तयार झाला. त्या बुडबुड्यात एक छोटी शाळाच तयार झाली जणू. आणि इतर फॉर्म्युला लोकांशी तुलना करता करता फॉर्म्युला मुलांचे फॉर्म्युला आई बाबा झाले. अणि असा एक मोठ्ठा संघ तुलना करण्यात मग्न झाल्यामुळे सगळेच हळू हळू दु:खी होऊ लागले. असं कसं बरं झालं? लौकिक यश विरुद्ध आनंद असा आलेख केल्यावर मात्र फॉर्म्युला लोक अत्यंत यशस्वी परंतु कमी आनंदी निघू लागले. आणि फॉर्म्युला काकूंना अचानक आपला फॉर्म्युला चुकला की काय असं वाटू लागलं. पण अर्थात त्यांनी हे कुण्णालाही बोलून दाखवलं नाही. पण आतल्या आतच त्यांना सारखी हुरहूर लागून राहिली. आपल्या मुलांनी तर सगळे बॉक्सेस टिक केले होते. मग त्यांना असं अपुरं अपुरं का वाटतंय?
पण काकूंचा फॉर्म्युला चुकला नव्हता. फॉर्म्युला यशस्वी आयुष्याचा होता. आणि तो त्याच्या सगळ्या परिमाणांवर चोख उतरला होता. पण काकूंचं एक असमशन चुकलं होतं. ते म्हणजे, या सगळ्या यशाच्या पलीकडे गेलं की आपण आनंदी होऊ. आणि दुसर्‍यांपेक्षा यशस्वी झाल्याने आपण त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी होऊ. आनंद नेहमी भविष्यकाळात कुठेतरी मृगजाळासारखा धावत सुटणारा, कधीही हाताला न लागणारा पदार्थ आहे असं फॉर्म्युला काकूंचा फॉर्म्युला सांगतो. आणि अचानक धावता धावता धाप लागून असं लक्षात येतं, की आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करणारे, कुठल्याही प्रथापित गणितांना भीक न घालणारे, मनाला वाटेल ते, वाटेल तेव्हा आणि वाटेल तस्सं करणारे, अपयशाची फिकीर न करता हृदयाला भिडणर्‍या सागरात उडी मारणारे लोक कधी कधी जास्ती आनंदी असतात. कारण कदाचित आपली आता कुणाशीच तुलना होऊ शकत नाही, आणि कुणाच्याही तुलनेत आपण आनंदी किंवा दु:खी असू शकत नाही, या जाणीवेतच त्यांना आनंद मिळतो.

Friday, February 10, 2012

एलोडी

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार असं काहीतरी आजोबा मला नेहमी ऐकवतात.
यात  उगीच कुठल्यातरी सभेत माझ्या अंगात भूत संचारलय असं चित्र माझ्या मन:चक्षूत  (वा वा. मस्त पुणेरी शब्द सापडला!) तयार होतं. पण देशाटन केल्याचे बरेच फायदे आहेत. आणि जरी प्रत्येक मित्र "पंडित" या क्याटेगिरीत मोडत नसला (मास्तर मोडला तरी नशीब), तरी अंतरराष्ट्रीय मैत्री फार फार उपयोगी पडते. माझी इकडची  पट्टमैत्रीण एलोडी हल्ली माझ्या आयुष्यात प्रभावशील झाली आहे. एलोडी मूळची फ्रेंच. तिनी फ्रान्समध्ये पी.एच.डी पूर्ण केली आणि आता माझ्या लॅबच्या शेजारच्या लॅबमध्ये तीदेखील पोस्टडॉक करते आहे. एलोडीच्या संगतीत राहून मी खूप काही शिकले. मी आता फ्रेंचमध्ये उत्तम शिव्या देऊ शकते. आणि गरजेपुरतं फ्रेंच शिकून झाल्यावर मी चांगल्या गोष्टीही बोलायला शिकले. =)
मला सलग दोन हजार मीटर पोहता येऊ शकतं हा साक्षात्कारदेखील मला एलोडीमुळेच झाला. मी कधीच बाराशे मीटरच्या वर जायचे नाही. पण एक दिवस एलोडीच्या बरोबर गप्पा मारता मारता आपण दोन किलोमीटर पोहलो असं माझ्या लक्षात आलं. आणि हा आत्मसाक्षातकार माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. शुक्रवारी संध्याकाळी कधी कधी आम्ही दोघी मिळून युरोपियन सिनेमे बघतो. तिच्याबरोबर राहून मला फ्रेंच सिनेमाबद्दल सुद्धा ब-याच नव्या गोष्टी कळल्या. या सिनेमांमध्ये शेवटी सगळे मारतात. किंवा मूळ पात्राला कर्करोग होतो किंवा सगळी पात्र डाव्या विचारांनी ग्रासलेली असतात. या सिनेमांमध्ये कधीच कुणाचीच स्वप्न पुरी होत नाहीत. किंवा स्वप्न पूर्ण व्हायच्या मार्गावर असताना, हे आपलं स्वप्न नाहीच मुळी असं पात्राला लक्षात येतं. या सिनेमांची फोटोग्राफी बघून तातडीने उन्हात जावसं वाटू लागतं. आणि एकूणच सिनेमाच्या शेवटी "असंच चालणार" असं वाटायला लागतं. अमेरिकन किंवा भारतीय सिनेमासारखी  जोषिली स्क्रिप्ट वगैरे इथे अजिबात नसते. आणि आठ दहा किलो कमी करून (आणि त्याबद्दल सगळ्या पेपरात आरडा ओरडा करून) कत्रिना इथे कैफात नाचत नाही. त्यामुळे मला युरोपियन लोकांच्या सत्य परिस्थिती पैसे देऊन बघायच्या या सवयीचं फार कौतुक वाटू लागलं आहे.
एलोडीचे आई बाबा शेतकरी आहेत. फ्रान्समधील वरदॉं या छोट्या गावात त्यांचं शेत आहे. तिचे आई बाबा कधीच फ्रान्सच्या बाहेर पडले नव्हते. या वर्षी तिला भेटायला इथे आले तो त्यांचा पहिला अंतरराष्ट्रीय प्रवास होता. आपल्या आई बाबांपासून आपण किती दूर आलो आहोत याची जाणीव सतत तिला होत असते. आणि अर्थात यात  मीही तिची "विचारसरू" आहे. पण एकमेकींच्या संपर्कात आल्यामुळे, तिच्या डोक्यातल्या भारताला आणि माझ्या डोक्यातल्या फ्रान्सला जोरदार तडा गेला आहे.फ्रेंच लोक भयानक शिष्ट असतात असं माझं ठाम मत होतं. आणि भारतीय लोक भयानक चौकशा करतात असं तिचं ठाम मत होतं. पण मला भेटून भारतीय लोकही फ्रेंच लोकांच्या मुस्काडीत मारेल इतका शिष्टपणा करू शकतात हे तिच्या निदर्शनास आलं. आणि फ्रेंच लोक इतके प्रेमळ असू शकतात हे मला उमगलं. एखाद्या दुकानात कुठलीतरी निरुपयोगी वस्तू भयानक किमतीला विकलेली बघून मी एकदा कुजकट इंग्लिशमध्ये शक्य तितका उपहास वापरून राग व्यक्त केला. तेव्हा तिनी मला  पॅरीसमध्ये राहण्यासाठी लागणारे सगळे गुण (?) माझ्याकडे आहेत असं सांगितलं. मग मी तिला माझ्यात हा कुजकट शिष्टपणा कसा आला ते समजावलं. यात लक्ष्मी रोडवरचे दुकानदार, चितळे बंधू, हिंदुस्थान बेकरी (सकाळी आठ वाजता "पॅटिस संपले" बोर्ड), पुण्यातील इतर कमी नामवंत पाट्या अशी उदाहरणे दिली.
एलोडीच्या आई-बाबांनी तिला इंजिनियर झाल्याबद्दल एक सशाचं पिलू दिलं. हे ऐकून मला लगेच आईला फोन करून, "बघा! शिका जरा!" असं म्हणावसं वाटलं. ते सशाचं पिलू घेऊन एलोडी पी. एच. डी करायला स्त्रॉसबर्गला गेली. दुर्दैवाने एका आठवड्यातच ते पिलू मेलं. आईपासून फार लवकर ताटातूट झाल्यामुळे ते मेलं असावं असा  एलोडीचा अंदाज होता. अर्धा एक तास दु:ख करून झाल्यावर ज्या दुकानदारानी  तिला पिलू विकलं होतं त्याला तिनी फोन करून झापलं. तुम्ही विकलेला ससा एका आठवड्यात मेला याची तुम्ही जबाबदारी घेतली पहिजे,  असा हट्ट केल्यावर त्या दुकानदारानी तिला मेलेला ससा परत घेऊन या, आम्ही नवा देतो असं वचन दिलं (हे ऐकून मला पुण्यात फ्रेंच लोकांनी वस्ती केली होती का, हे शोधून काढावसं वाटलं). एलोडीला घरी जायला अजून एक आठवडा बाकी होता. त्यामुळे मेलेला ससा कसा जतन करायचा याची चिंता तिला भेडसावू लागली. काही मित्रांना, "तुझ्या फ्रीजरमध्ये माझा मेलेला ससा ठेवशील का?", असं विचारल्यावर ते तिच्या आयुष्यातून कायमचे नाहीसे झाले. शेवटी तिच्या लॅबमध्ये बेन्झीन आणि टोल्वीनच्या बाटल्यांच्या मधोमध सासुल्याचा मृतदेह ठेवण्यात आला. आठवड्याच्या शेवटी बेन्झीनच्या सुगंधाने दरवळणारा दिवंगत ससुल्या बियर थंड ठेवायच्या कूलरमध्ये बर्फाच्या पांघरुणात ठेवण्यात आला. तो कूलर घेऊन लगबगीने ट्रेनमध्ये चढताना एलोडीला ठेच लागली. आणि अशा विचित्र गोष्टीला शोभेल असं वळण घेत ट्रेनमधल्या समस्त प्रवाशांना ही मुलगी या कूलरमधून काय घेऊन जाते आहे याचं दर्शन घडलं. दोन तास संशयाचे बाण झेलत एलोडी स्वत:च्या गावी पोचली. आणि दुकानदारानेही दिलेल्या शब्दाप्रमाणे तिला नवीन ससा दिला.
ही डार्क विनोदी कथा ऐकून माझा एलोडीबद्दलचा आदर एक किलोनी वाढला. एलोडीची अजून एक खोड म्हणजे तिला सायकॉलॉजीत फार रस आहे. मी इतकी भांडकुदळ का आहे याचं नातं तिनी माझ्या आणि माझ्या आईच्या नात्यातील मूलभूत आधारस्तंभांशी जोडलं. त्यामुळे माझ्या भांडकुदळपणाला माझी आई जबाबदार आहे या साक्षातकारानी मी हर्षभरीत झाले. कारण माझी आई नेहमी माझ्या भांडखोरपणाचं खापर माझ्या गरीब बिचा-या बाबाच्या डोक्यावर ठेवते. मग आमच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक गोष्टीचं आम्ही फावल्या वेळात सायको अॅनॅलिसीस करतो. कुठल्याही माणसानी आमच्याशी दुष्टपणा केला की त्याचं लहानपण कसं दु:खी असणार असे अंदाज आम्ही बांधू लागतो. आणि याचा फार मोठा फायदा म्हणजे आपल्या शत्रूबद्दल अतीव करुणा याखेरीज दुसरी कुठलीही भावना मनात येत नाही. एलोडीमुळे माझ्या मनात पुण्यातील समस्त भोचक संप्रदायाबद्दल देखील ही भावना उत्पन्न झाली आहे.
या मैत्रीचा अजून एक फायदा म्हणजे आम्हाला दोघीनाही एकाच प्रकारच्या चिंता भेडसावतात हे आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे माझ्या चिंतेचा फ्रेंच अनुवाद कसा आहे तेही माझ्या निदर्शनास आलंय. आधी मला माझ्या ब-याच काळज्या मी बिकट वाटेवरून चालणारी भारतीय अबला नारी आहे, या एकाच कारणामुळे आहेत असं वाटायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये यातील फक्त "भारतीय" आणि "नारी" ही विशेषणं मला लागू पडतात असं माझ्या लक्षात आलं आहे. दुर्दैवानी माझी वाट बिकट नाही आणि अबला तर मी मुळीच नाही. एलोडीला भेटल्यामुळे "भारतीय" हे विशेषणदेखील त्या यादीत अत्यावश्यक नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण एकाच वयाच्या दोन वेगवेगळ्या देशांतून येणा-या मुलींना एकसारख्याच चिंता असतात असं आमच्या दोघींच्याही लक्षात आलं. आणि त्या चिंतेचं सायको अॅनॅलिसीस केल्यावर असं लक्षात आलं की यातील खूप मुद्दे हे दुस-यांचं आपल्याबद्दल काय मत आहे यावर आधारित आहेत. आणि दोन हजार मीटर पोहून झाल्यावर यातील बरेच मुद्दे आमच्या मन:चक्षूतून गयाब होतात. :)

Friday, January 20, 2012

फास्ट फूड नेशन

मूळ प्रकाशन: मायबोली  (http://www.maayboli.com/node/32089)

अमेरिकेनी जगाला काय दिलं?
या प्रश्नाच्या उत्तरांची वर्गवारी करता येईल. आणि प्रत्येक उत्तराकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतील. पण आजच्या काळात बरेच लोक अमेरिकेनी जगाला नको त्या गोष्टी दिल्या या विचारलाच दुजोरा देतील. भारतात गेल्या दोन दशकांपासून चाललेल्या "सांस्कृतिक अध:पतनासाठी" बरेच लोक अमेरिकेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात. अर्थात, त्यात चूक काहीच नाही. अमेरिकेनी जगाला एक नवीन संस्कृती दिली. आणि सुसंस्कृत समाजानी या अतिक्रमणाचा वेळोवेळी निषेध केला.
तर काय बरं नाव देता येईल या नवीन संस्कृतीला? माझ्या मते अमेरिकेनी जगाचं "मॅकडॉनाल्डीकरण" केलं. आणि यात फक्त जिथे तळलेले बटाटे आणि बर्गर मिळतात त्या एकसारख्या दिसणार्‍या खानावळींचा समावेश नसून, त्यामागून येणार्‍या विचारधारेचाही समावेश होतो. यावर लिहिलेलं "फास्ट फूड नेशन" हे पुस्तक माझ्या नुकतच वाचनात आलं. मॅकडॉनल्ड्सचा जन्म, आणि आजपर्यंतचा प्रवास यावर हा पुस्तकवजा प्रबंध एरिक श्लॉसर यांनी लिहिला आहे. यात प्रामुख्याने मॅकडॉनल्ड्सचा इतिहास असला तरी अमेरिकेतील इतर फास्ट फूड चेन्सचा देखील धावता अभ्यास केला आहे.
फास्ट फूड या खाद्यशाखेचा जन्म हा पेट्रोलवर चालणार्‍या चारचाकी गाड्यांच्या उदायाशी निगडीत आहे. अमेरिकेत चारचाकी गाड्या सामान्य माणसांच्या हातात आल्यावर, गाडीत बसून हवं ते मागवता आणि खाता यावं, या "गरजेतून" ड्राइव इन रेस्तरांचा "शोध" लागला. गाडीचालक मुलखाचा आळशी असतो. आणि त्याच्या आळशीपणाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल, या भावनेतून मॅकडॉनल्ड बंधूनी पाहिलं मॅकडॉनल्ड्स उघडलं. ते साल होतं १९४५. पण पहिली अमेरिकन वडापावची (हॉट डॉग) गाडी कार्ल नावाच्या जर्मन-अमेरिकन तरुणांनी लॉस एंजलीसमध्ये त्याच सुमारास टाकली. याचं रुपांतर पुढे कार्ल जुनियर या प्रसिद्ध फास्ट फूड चेनमध्ये झालं. फास्ट फूडचा जन्म आणि जागतिक उद्योगीकरण यांचा फार जवळचा संबंध आहे. अन्न पदार्थ घावूक प्रमाणात कसे बनवता येतील, हा प्रश्न त्याकाळी खूप महत्वाचा मानला जायचा. आणि ते त्या प्रमाणात बनवताना त्यांची क्वालिटी कुठेही कमी पडणार नाही अशी हमी देऊ शकणारे उद्योजक श्रेष्ठ मानले जायचे. सुरुवातीला मॅकडॉनल्डमध्ये आखूड फ्रॉक घालून वाहनचालकांकडून ऑर्डर घेणार्‍या तरुण वेट्रेसेस असायच्या. आणि सर्व पदार्थ काचेच्या बशा, धातूची कटलरी वापरून पेश केले जायचे. पण हळू हळू वेळ आणि पैसा वाचवण्याच्या हेतूने वेट्रेस आणि कटलरी दोन्हीवर काट मारण्यात आली.
मॅकडॉनल्डच्या स्थापनेपासूनच जोरदार चालणारा खाद्य पदार्थ म्हणजे त्यांचे प्रसिद्ध फ्रेंच फ्राईज. फ्रान्समध्ये देखील हे "फ्रेंच" फ्राईज इतके प्रसिद्ध नाहीत जितके ते मॅकडॉनल्डमुळे झाले. मॅकडॉनल्डच्या प्रत्येक बर्गर बरोबर फ्राईजचं एक पाकीट विकण्यात येतं. साधारण एका बोट रुंदी आणि लांबी असलेले बटाट्याचे तुकडे एका विशिष्ट पद्धतीने तळण्यात येतात. ही तळण्याची पद्धतदेखील खूप प्रयोग करून नियमित करण्यात आली आहे. मॅकडॉनल्डची फ्राईज प्लांट्स दिवसागणिक दोन मिलियन पौंड फ्रोझन फ्राईज बनवतात. १९६६ सालापासून मॅकडॉनल्डनी फ्रोझन फ्राईज विकत घेऊन आयत्या वेळी तळून ग्राहकांना पुरवायला सुरवात केली. यात नुसता वेळ आणि पैशाचा हिशोब नव्हता. १९६० च्या दरम्यान मॅकडॉनल्डच्या साखळीने संपूर्ण अमेरिकेला वेढा घातला होता. प्रत्येक मॅकडॉनल्डमधले फ्रेंच फ्राईज एकसारखे दिसावेत आणि चाविलादेखील सारखे असावेत हा ही हेतू या बदलामागे होता. पण असा नियमितपणा आणताना, हे गोजिरवाणे बटाटे एकदा तळून गोठवण्यात येतात. आणि विक्रीच्या ठिकाणी पुन्हा एकदा तळण्यात येतात! या एका पदार्थाने अमेरिकन शेतीमध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली. आणि अमेरिकेच्या पोटी आलेल्या या बटाटेसुराची भूक भागवण्यासाठी शेतकर्‍यांनी रसेट बटाटे उगवायला सुरुवात केली. पण या क्रांतीतून (नेहमीप्रमाणे) शेतकर्‍यांचा फार कमी फायदा झाला.
मॅकडॉनल्डनी अजून एका क्षेत्रात क्रांती घडवली. ती म्हणजे "टीनएजर" एम्प्लॉयमेंटमध्ये. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे अठरा वर्षाखालील मुलांना पार्ट टाईम कमी पैशात (मिनिमम वेज) काम करता येते. याचा सगळ्यात मोठा फायदा मॅकडॉनल्डनी करून घेतला. बिगारीवर काम करणारी लाखो तरुण मुलं मुली रोज सकाळी सहा वाजता वेगवेगळी मॅकडॉनल्ड उघडत असतात. यातील बरीच अजून आई बाबांच्या घरी राहत असतात. त्यामुळे मिळणार्‍या पैशातून गाडी घेणे, चैनीच्या वस्तू पालकांचा जाच न होता विकत घेणे अशा गरजेमधून हा रोजगार चालतो. मॅकडॉनल्डचा दुसरा कामगार वर्ग म्हणजे अनस्किल्ड इमिग्रंट्स. परदेशातून आलेले (मुख्यत्वे मेक्सिकोहून), इंग्लिश न येणारे, गरिबीत राहणारे कित्येक लोक मॅकडॉनल्डच्या आश्रयाला येतात. पण त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती (विशेष करून वैद्यकीय) दिल्या जात नाहीत. कामगारांनी कुठल्याही प्रकारचा कामगारसंघ बनवू नये यासाठी मॅकडॉनल्ड खूप प्रयत्नशील आहे. तिथलं काम इतकं नियमित केलं आहे की कुठल्याही कर्मचार्‍याच्या सोडून जाण्यामुळे नुकसान होत नाही. मॅकडॉनल्डकडे तिथे काम करणारे सगळे लोक पुढे जाण्याची एक पायरी या हेतूनेच बघतात. आणि त्यामुळे मॅकडॉनल्डचा "टर्न ओव्हर रेट" खूप जास्त आहे.
फ्रेंच फ्राईजनी जशी अमेरिकन शेतीत क्रांती घडवली तशीच अजून एक क्रांती मॅकडॉनल्डने बीफ उद्योगात घडवली. मॅकडॉनल्डला घावूक प्रमाणात बीफ पुरवता यावं या हेतूने बीफ उद्योगाने बरीच तांत्रिक प्रगती केली. बीफ आता छोट्या, संपूर्णपणे मानवी कौशल्याने चालणार्‍या उद्योगांकडून न येता, मोठ्या संपूर्णपणे मेकॅनाईझ्ड कारखान्यांमधून येऊ लागलं. बोनलेस बीफ खीम्याच्या स्वरूपात, तापमान नियंत्रित वाहनातून मॅकडॉनल्डला पोहोचवण्यात येऊ लागलं. या बदलामुळे बीफ उद्योगातील कामगारांच्या मिळकतीवर विपरीत परिणाम झाला. एके काळी भरपूर पैसे मिळणारा हा उद्योग अचानक आजारी झाला. आज जसे डेट्रॉइटमध्ये ओस पडलेले गाड्यांचे कारखाने दिसतात तसेच त्या काळी आजारी होऊन बंद पडलेले बीफचे कारखाने दिसायचे. बीफ उत्पादन महाग असायचं अजून एक कारण म्हणजे इथे काम करणार्‍या कामगारांना प्रचंड जोखीम पत्करावी लागायची. बर्‍याच कामगारांना अपघात व्हायचे आणि कधी बोटावर तर कधी संपूर्ण हातावर बेतायचं. एका अर्थाने बीफ उत्पादन मशिनरी वापरून होऊ लागलं हा चांगला बदल म्हणता येईल. पण त्या बदलाचा कामगारांच्या मिळकतीवर परिणाम झाल्यामुळे हे चांगलेपण झाकोळून गेलं. या उद्योगातील प्रत्येक कामगारसंघाला अगदी शांतपणे चिरडून टाकण्यात आलं. कधी कधी कारखान्यातल्या सगळ्या कामगारांना एकाच वेळी नोकरीवरून बरखास्त करण्यात यायचं आणि त्यांच्या जागी जवळपास ४०% कमी पगारात काम करणार्‍या नवीन लोकांना नेमलं जायचं. संपावर गेलेल्या कुठल्याही कामगाराला पुन्हा नोकरीवर घेतलं जायचं नाही.
हल्लीच्या काळात मॅकडॉनल्डवर केलेला अजून एक आरोप म्हणजे त्यांच्या जाहिरातींमधील लहान मुलांवर केलेलं छुपं प्रोग्रामिंग. लहान मुलं पालकांवर मानसिक दबाव आणू शकतात या अगदी साध्या "सत्यातून" मॅकडॉनल्डनी त्यांच्या जाहिराती लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बनवल्या आहेत. मार्केटिंग विश्वात आई बाबांकडे हट्ट करण्यार्‍या मुलांचं वर्गीकरण करण्यात येतं. यात नुसती भुणभुण करणारी, पुन्हा पुन्हा आठवण करून देणारी, प्रेमानी गळ घालणारी आणि तमाशा करणारी असे सोपे वर्ग केले आहेत. मॅकडॉनल्डच्या हॅपी मीलवर खूप टीका झाली. हॅपी मीलमधून लहान मुलांसाठी मॅकडॉनल्ड वेगवेगळी खेळणी वाटू लागलं. काही खेळण्यांचे संपूर्ण सेट वेगळ्या वेगळ्या डब्यांमध्ये विखुरण्यात आले. त्यामुळे पालकांवर ही खेळणी मुलांना जमवता यावीत यासाठी खूप तणाव येऊ लागला. मग अशा वेळेस आपल्या मुलाला मीलमधून मिळणा-या खेळण्यासाठी पूर्ण दिवसासाठी लागतील इतक्या कॅलरीज त्याला एकाच वेळेच्या जेवण्यात देऊ करायच्या का, असा साहजिक प्रश्न सुजाण पालकांना पडतो. पण मुलं शाळेतून घरी येतात आणि इतर मुलांची उदाहरणं देतात. अशा वेळेस पालकांनी काय करायचं? नुकताच सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अशी खेळणी विकण्याविरुद्ध कायदा करण्यात आला आहे. पण त्यावर दहा सेंट्सला ही खेळणी वेगळी विकण्याचा "जालिम उपाय" मॅकडॉनल्डनी शोधून काढला आहे.
अमेरिकेतल्या कित्येक स्टेट्समध्ये हल्ली मॅकडॉनल्ड शाळांमध्ये सुद्धा जाहिराती करतात. शाळेतल्या कॅन्टिनमध्ये मुलांना फास्टफूड विकण्यात येतं. आणि कित्येक शाळा या जाहिरातींच्या मोबदल्यात मिळणार्‍या पैशांसाठी या निर्णयाचं समर्थन करतात. अशा जाहिराती करून मॅकडॉनल्डनी एक अख्खी अमेरिकन पिढी वाढवली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात जे नवीन पालक आहेत, त्यापैकी काहींच्या मनात मॅकडॉनल्डच्या नॉस्टॅलजिक आठवणी आहेत (हे साधारण भारतीय लोकांना मॅगी बद्दल असलेल्या भावनांसारखं म्हणता येईल). त्यामुळे आता मॅकडॉनल्डशी एक भावनिक धागासुद्धा जुळला आहे.
पण या सगळ्याचा परिपाक काय? या पुस्तकातली मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे लेखकानी हे पुस्तक नि:पक्ष होऊन लिहिलं आहे. अर्थात मॅकडॉनल्डमुळे लोकांच्या खाण्याच्या संकल्पनेलाच एक नवीन वळण मिळालं. आणि ते चांगलं नक्कीच म्हणता येणार नाही. अमेरिकन समाजावर या व्यवस्थेचे बरेच वाईट परिणाम झाले. स्थूलता, आळशीपणा, हृदयविकार, डायबेटीस अशा बर्‍याच व्याधींचं मूळ हा आहार मानला जातो आणि यावर बरंच संशोधनदेखील झालं आहे. पण मॅकडॉनल्ड ही संकल्पना अतिशय नवीन होती आणि ती इतक्या दूरवर नेण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे हे मात्र निश्चितपणे म्हणता येईल. मॅकडॉनल्ड बाहेरच्या देशांनी सुरुवातीला साफ खोडून काढलं. प्रत्येक नवीन राष्ट्रात आणि त्याच्या समाजात मॅकडॉनल्डला पुन्हा नव्यानी सुरुवात करावी लागली. भारतात बिग मॅकचा महाराजा मॅक झाला. जपानमध्ये श्रिम्प बर्गर "कात्सु" सॉस बरोबर विकण्यात येऊ लागले. चिलीमध्ये केचपऐवेजी ग्वाकामोली देण्यात येऊ लागलं. ग्रीसमध्ये बन ऐवेजी पिटा विकण्यात येऊ लागला. इस्राएल मध्ये मॅकशवर्मा विकण्यात येऊ लागला. प्रत्येक देशातील लोकांच्या आवडी निवडी ओळखून आणि त्यांच्या धार्मिक भावना समजून मेन्यू आखणे आणि तो शक्य तितका नियमित करणे हे खरोखर अवघड काम आहे. हे काम करताना मॅकडॉनल्डला बरेच आर्थिक फटकेही बसले आहेत.
जरी पुस्तकातील इतर गोष्टी वाचून माझ्यातील डावी बाजू संतापली असली, तरी त्यांच्या या सृजनशीलतेचं आणि उद्योगशीलतेचं माझ्यातील उजव्या आणि कल्पक बाजूकडून कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. शेवटी इथे खायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. मॅकडॉनल्डनी आपल्यावर अतिक्रमण केलं आहे असा विचार करताना, त्या जोडीला आपण मॅकडॉनल्डमध्ये का जातो, हा विचारही झाला पाहिजे.
आजकालच्या जगात टु बी ऑर नॉट टु बी वळणावर आणून ठेवणार्‍या इतरही बर्‍याच गोष्टी आहेत. त्यामुळे विरोधच करायचा असेल तर नुसताच या कंपन्यांना न करता आपल्या आतील आहारी जाणार्‍या मनालाही केला पाहिजे. नाही का?

Thursday, January 5, 2012

चॉईस इज हेल

 मूळ प्रकाशन: मायबोली १ ऑक्टोबर २०११ (http://www.maayboli.com/node/२९४७७)

सोळा - सतरा वर्षांची असताना मी कुठेतरी "चॉईस इज हेल" हे वाक्य वाचलं होतं. तेव्हा त्यावर मी, "श्शी! काऽही काय!" अशी प्रतिक्रिया दिल्याचं मला चांगलंच आठवतंय. पर्याय हा माणसाचा शत्रू कसा असू शकेल? तेव्हा आई-बाबांच्या घरात राहणारी, अगदी कडक नसली तरी शिस्तप्रिय घरात वाढलेली, मैत्रिणींच्या रिंगणात वावरणारी अशी मी या वाक्याचा पूर्ण अर्थ समजू शकले नव्हते कदाचित. त्यामुळे या लेखकाचं काहीतरी बिनसलंय असं कनक्लूजन मी काढून रिकामी झाले. समोर असे ए, बी, सी, डी पासून ते अगदी झेड पर्यंत पर्याय हवेत असं माझं ठाम मत होतं. त्यामुळे खूप पर्याय असलेल्या आयुष्याच्या वळणाची मी आतुरतेने वाट बघत होते. ते वळण मला अमेरिकेतल्या ग्रोसरी शॉप्स मध्ये गवसलं. आणि आपण इतके दिवस इतक्या भ्रमात का वावरलो याचा खूप मोठा पश्चाताप झाला. साधा केक करायचा होता मला. भारतातली दुकानं कशी केक-फ्रेंडली नाहीत यावर मी खूप टकळी वाजवून आले होते.
मी: आई, भारतात चांगलं बटर मिळत नाही गं!
तिनी लग्गेच घरातलं लोणी दाखवलं.
आई : सई, जगात सगळीकडे मिळणारं बटर गोमातेच्या उदरातून अशाच रूपात येतं. त्यामुळे हे लोणी तू ३०० डिग्रीला नेलस तर तुझ्या परदेशी बटरचंच काम करेल.
तेव्हापासून (विनापर्याय, आज्ञेवरून) घरातल्या लोण्यातच केक करण्यात आले.
मी: आई रॉ शुगर यु नो.
आई: कनक गूळ *सणसणीत कानाखाली*
मला हवं तसं कुकिंग चॉकलेट मिळत नव्हतं म्हणून मी कोको पावडर आणि कुठून तरी उत्पन्न झालेलं इंडसट्रीयल ग्रेडचं चॉकलेट मिसळून मस्त फ्लेवर तयार केला. आणि ऑरेंज लीक्युअर वगैरे नखरे नसल्यामुळे सरळ झाडावरून आलेली मोसंबी आणि त्याची साल वापरली. झाला चॉकलेट-ऑरेंज केक! बाबांनी मुलीला केक करायला म्हणून कौतुकाने ब्रॅन्डी आणून दिली (निषेधार्थ काळ्या पिशवीतून मिळणारी). त्यातही असं बागेत फिरल्यागत दारू सेक्शनमध्ये बागडता न आल्याचा राग मला होताच!
तोच केक इथे करताना पहिल्या स्टेपलाच दहा पर्याय.
बटरमध्ये सॉल्टेड, अनसॉल्टेड, लो फॅट, नो फॅट, फुल फॅट, युरोपिअन (त्यात अॅमस्टरडॅमहून आलेलं उगीच फेटा बांधून वेगळं), बटरसारखं दिसणारं पण बटर नसणारं, बटर नसणारं पण बटरपेक्षा वाईट असणारं, तेलही नसणारं आणि तूपही नसणारं पण तरीही कुणालातरी हवं असणारं असे कैक प्रकार! हे सगळं बघता बघता पहिल्या दिवशी माझी बस चुकली. पुढच्या वेळेसाठी मी माझ्या फोनमध्ये दुकानात ज्या जागी मला हवं असलेलं बटर ठेवलाय त्याची जी पी एस नोंद केली.
चॉकलेटमध्ये ५० %, ६० %, ७० %, ८० % कोको अशी वर्गवारी असते. त्यात प्रत्येक ब्रँडचे पुन्हा हे सगळे पर्याय. त्यानंतर सेमिस्वीट, बिटर, स्वीट, असे कटू-गोड पर्याय येतात. आणि शेवटी कुठलं चॉकलेट घेतल्यानी आपण जास्तीत जास्त बचत करू (आणि न लागणारी वस्तू घेतल्याचा पश्चाताप बचत केली या खोट्या आनंदानी झाकून टाकू) हा एक अपरिहार्य पर्याय. मग चॉकलेटच्या रॅकसमोर, इतका सगळा विचार केल्यानी भूक लागते आणि त्या नादात चीप्सचं एक पाकीट बास्केटमध्ये शिरतं. सगळ्यात जास्त संताप मला तेव्हा येतो जेव्हा मी माझं समजून तसंच दिसणारं दुसरं काहीतरी उचलून आणते. जसं की ६० % कोको ऐवेजी ८० % कोको वालं चॉकलेट. त्यामुळे माझे साखरेचे अंदाज चुकतात आणि मला भयानक वगैरे मनस्ताप होतो. हे हमखास मी कुणालातरी "मी उद्या तुझ्यासाठी केक आणीन" असं आश्वासन दिलेलं असताना घडतं.
ऑरेंज हे फळ सुद्धा इतक्या पर्यायात येतं की हुंदका आवरत नाही. लोकल विरुद्ध स्पेनहून उडून आलेली वालेन्सिया. त्या इम्पोर्टेड फळांच्या कार्बन पाऊलखुणा (फूटप्रिंट) लोकलपेक्षा किती मोठ्या आहेत हा विचार करायचा आणि मग मनातल्या शास्त्रज्ञाचं ऐकायचं की ती फळं ज्या बुडून चाललेल्या देशातून उडून आलीयेत त्या देशाचा माणुसकीने विचार करायचा याचा विचार. एवढ्या सगळ्या विचारानंतर ते फळ उतरलेलं असेल तर कुणाच्या डोक्यावर मारायचं याचा विचार! आणि नुसतच सिट्रस असं काहीतरी हवं असेल तर अल्लाह मलिक! कारण इथे सिट्रस फळांचे इतके पर्याय आहेत की मला केशरी रंगाचं काहीच नको म्हणायची वेळ येते!
अंडी सुद्धा उडणा-या कोंबड्यांची विरुद्ध बंदिस्त कोंबड्यांची. ऑरगॅनिक विरुद्ध इनऑरगॅनिक ! स्मित
फायनली मुक्त विहार उपलब्ध असलेल्या दारू सेक्शन मध्ये केकसाठी रम आणायला जावं तर रमचेही इतके प्रकार की त्यावर अभ्यास करण्यापेक्षा एखादी बाटली इथेच मारून खरेदीचा सगळा ताण तरी घालवावा नाहीतर सरळ लॅब मधलं अब्सोल्यूट अल्कोहोल आणावं अशी हालत होते!
ऑस्ट्रेलियात असताना एकदा मी एका रोमेनियन काकूंना भेटले होते. त्यांनी कम्युनिस्ट राजवट संपल्याचं फार मार्मिक वर्णन केलं होतं. "जेव्हा आमच्याकडे कम्युनिझम होतं, तेव्हा सगळ्यांकडे नोक-या होत्या आणि पैसे होते. पण बाजारात पैसे देऊन विकत घ्यायला वस्तू नव्हत्या. आता लोकशाहीत (खुल्या बाजारपेठेत), बाजारात पैसे देऊन विकत घेता येण्यासारख्या खूप छान छान वस्तू आहेत, पण आमच्याकडे ना नोक-या आहेत, ना पैसा!" स्मित
कधी कधी खरंच, "माझ्याकडे पर्याय नाही" म्हणणारा आणि "माझ्याकडे खूप पर्याय आहेत" म्हणणारा, दोघे एकाच पायरीवर येतात. त्या पायरीची जादू वेगळीच आहे. एकाला आपण काय काय करू शकलो असतो, पण करू शकलो नाही याचं दु:ख तर दुस-याला आपण इतकं काही करू शकत होतो, पण आपण योग्य पर्याय निवडलाय का, याची हुरहूर. एकाच्या हाती न मिळालेल्या रस्त्यांचा नकाशा, तर दुस-याकडे आपण नक्की कुठे चुकलो, हे शोधण्याचं मायाजाल. आणि आयुष्याच्या मोठ्या निर्णयांमध्ये या दोन बाजू जरी टोकाच्या वाटल्या तरी त्या जी असहायता निर्माण करतात, ती सारखीच आहे. कधी कधी जगाचा विचार करताना (हो आम्ही असलेही विचार करतो! पण इथे "जगाचा विचार" हे भोचक संप्रदायातील रूपक लागू नाही) असं वाटतं की अर्धं जग बंधनांमुळे स्वतंत्र आहे आणि अर्धं स्वातंत्र्यानी बांधलेलं आहे! काही लोकांना या दोन्ही बाजू अनुभवता येतात. आणि जरी तो अनुभव थोडा अवघड असला, तरी अशा दोन बाजू अस्तित्वात आहेत हे समजण्यातसुद्धा एक छोटीशी शांती आहे. स्मित

तुझं लगीन साळू

 मूळ प्रकाशन: मायबोली २७ ऑगस्ट २०११ (http://www.maayboli.com/node/२८४५९)

नुकतेच आम्ही पी.एच.डीरूपी डोंगर पोखरून थिसीसरूपी उंदीर बाहेर काढून मायदेशी सुट्टीला आलो. अपेक्षेप्रमाणे 'इतरे जन' या क्याटेगीरीत बसणा-या सगळ्यांना एकच जटील समस्या आहे. ती म्हणजे आमच्या बोहल्यावर चढण्याची. तू लग्न कधी करणार? या प्रश्नाकडे येण्यासाठी लोक काय काय नागमोडी वळणं घेतात वाह!
त्यातील काही निवडक उदाहरणे देऊन मी माझा थिसीस इथे मांडू इच्छिते (पी. एच. डी झाल्याचा हा एक तोटा असतो. सगळीकडे निरीक्षण-निष्कर्ष वगैरे करायची नको ती सवय लागते.). [१]
उदा. १ सुमन काकू
सुमन काकू नेहमी सकाळीच येतात. आम्ही आमच्या स्वयपाकवाल्या मावशींच्या हातचे टुम्म फुगलेले फुलके एका पाठोपाठ एक असे रिचवत असतो. आमचं सुख सुमन काकूंच्या डोळ्यावर येतं आणि पहिला गुगली त्या आमच्या दिशेने भिरकावतात.
सुमन काकू: तब्येत सुधारली बरंका मागल्या वेळेपेक्षा.
यातला 'बरंका' हा शब्द वार्निंग स्वरूपात उच्चारला जातो. आम्ही मावशींना पुढचा फुलका आमच्या ताटाऐवेजी डब्यात टाकायला सांगतो.
मी: हो. थिसीस लिहायच्या टेन्शन मध्ये पाळायला जाता यायचं नाही हो म्हणून. पण आता सुरु केलाय पुन्हा.
सुका: हो आता जरा वजन कंट्रोल मधेच ठेवलं पाहिजे काही वर्षं.
इथून आम्हाला पुढे येणा-या प्रश्नाची कुणकुण लागू लागते. मग तो प्रश्न किती वेळ चकवता येईल याचा अभ्यास आम्ही करू लागतो.
मी: अहो अजून काही वर्ष कशाला. कायमच ठेवलं पाहिजे. (नाहीतर आमची पण सुमन काकू होईल ना लवकरच.) आता अमेरिकेला गेल्यावर मी लगेच जीम सुरु करणारे. योगासनं वगैरे तर चालूच आहेत.
सुका: (आईकडे डोळे आश्चर्य-अविश्वास या विविध रसांनी डबडबून बघत) ही अमेरिकेला जाणार आता? काय हे?
मी: हो मला तिकडे पोस्ट-डॉक मिळालीये. त्यामुळे मी खूप खुशीत आहेत.
सुका: हो पण लग्नाचं काय मग?
हात्तिच्या.अपेक्षेपेक्षा आधीच आला.
मी: बघायचं. पुढे केव्हातरी.
यावर सुका मगाच्या आश्चर्य -विस्फारित डोळ्याचं व्हर्जन टू सादर करतात.
उदा. २
श्री. व सौ. देशपांडे
श्री: कशात पी. एच. डी केलीस? थिसीसचं टायटल काय होतं?
मला थिसीसचं टायटल माझ्या गाईडनी सुद्धा विचारलं नाही कधी. मी जे काय बाड समोर ठेवलं त्यावर त्यांनी "गेली एकदाची भांडकुदळ बया ही", अशा आनंदात सही केली. त्यामुळे कुणी थिसीसचं टायटल अशी बाळबोध सुरुवात केली की माझ्यातल्या नवसंशोधकेला हुरूप येतो. त्यावर मी माझ्या थिसीसचं शक्य तितकं देशपांडेकरण करून सांगू लागले. थोड्याच वेळात देशपांडे काकांच्या मुखातून एक इवलीशी जांभई सटकली. त्याचा दोष मी त्यांनी नुकत्याच पुरीनी साफ केलेल्या आमरसाच्या वाटीला दिला.
श्री.: असं असं. मग आता पुढे काय?
या प्रश्नावर शक्य तितक्या लवकर झेप मारून सभा आपल्या ताब्यात घ्यावी लागते. पुण्यात पब्लिक डिस्कशनचे वेगळे नियम आहेत. इथे संवाद साधण्याची सगळ्यात रूढ पद्धत म्हणजे पुढच्याला जिथे संवाद न्यायची सुप्त इच्छा आहे त्याच्या विरुद्ध दिशेला तो घेऊन जाणे. यासाठी विचारांची चपळाई, विनम्रतेचा संपूर्ण आभाव, आणि मोठ्ठा आवाज हे घटक महत्वाचे आहेत. हे सगळं समप्रमाणात वापरून मी सभेचा ताबा घेतला.
मी: अमेरिकेला जाणार. तिकडच्या एका बायोफुएल्स रिसर्च ग्रुपमध्ये मला पोस्ट-डॉक मिळाली आहे.
सौ: अगं? अजून शिकणार तू? बास की आता!
मी: नाही नाही. पोस्ट-डॉक म्हणजे नोकरीच असते हो (जगभरात नवीन पी.एच.डी झालेल्या लोकांना कमी पगारात सासुरवास करण्यासाठी दिलेलं ते गोंडस नाव आहे काकू. पण हे तुम्हाला सांगून मी तुमचा आनंद द्विगुणीत करू इच्छित नाही).
सौ: मग पुढे काय?
हा प्रश्न विचारताना काकूंच्या चेह-यावर, "बघतेच कशी पळून जाते आता ही" असा भाव असतो.
मी: सांगितलं की. अमेरिका.
सौ: ते नव्हे ग. शिक्षण वगैरे झालच की. नोक-या वगैरे पण हल्ली सगळ्यांनाच मिळतात. पण बाकीही गोष्टी असतात ना आयुष्यात. लग्ना-बिग्नाचं काही ठरवलंयस की नाही?
माझ्या साडेतीन वर्षं खस्ता खाऊन मिळालेल्या डिग्रीचा आणि रात्री दीड वाजता फोनवरून इंटरव्यू देऊन मिळालेल्या नोकरीचा सपशेल कचरा.
मी: हो करणार ना. पुढच्या वर्षी.
सौ: कुणाशी? ठरवलंयस वाटतं!
हे विचारताना सौ देशपांडेंच्या चेह-यावर, मी म्हणजे सैफ आली खानच्या हातात हात घालून फिरणारी करीना कपूर आहे असे भाव असतात. मग माझ्या मनाचा इंटेल प्रोसेसर पटकन मी करीनाइतकी बारीक झाले तर कशी दिसीन ही चित्र तयार करतो. ते बघून मी सुखावते. पण त्या चित्रापर्यंत जायला किती पाळावं लागेल, एस्पेशली सुमन काकूंचा टोमणा आठवून, याचा विचार करून माझ्या मनाची हार्ड डिस्क क्रॅश होते.
मी: नाही हो काकू. बघेल आई.
मग एक अतिशय सहानुभूतीदर्शक कटाक्ष माझ्या माऊलीच्या दिशेने टाकण्यात येतो.
या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं तरी पंचाईत होते.
लग्न करणार नाही असं म्हटलं तर लग्नाचे फायदे या विषयावर फुकट समुपदेशन होतं. त्यात हल्लीच्या मुली कशा करियरीस्ट झाल्यात आणि त्यामुळे ओघानी येणारं समाजाचं विघटन आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल मतं व्यक्त केली जातात. मग म्हातारपणातील एकटेपणा, स्त्रियांच्या (मूल)भूत गरजा, आयुष्याच्या समरात लढण्यासाठी जोडीदार (यात लढाई जोडीदाराशीच असते बरंका) वगैरे बागुलबुवा दाखवले जातात.
करीन म्हटलं तर कधी? कुणाशी? कुठे? असे एकातून एक उद्भवणारे उपप्रश्न तयार असतात.
"तुम्हाला काय करायचय?" असा (स्वाभाविक) प्रश्न विचारला तर ज्यासाठी बोलावलंय ते जेवण मिळणार नाही ही लग्न न होण्यापेक्षाही मोठी भीती असते.
काही लोक तोंडानी लग्न हा शब्द उच्चारल्यानी कुठलातरी अलिखित सामाजिक नियम मोडला जाईल या भीतीने की काय हातवारे करून लग्नाबद्दल विचारतात.
परवा एका बाईंनी मला 'आणि.." नंतर हवेत अक्षता टाकल्याचे विनोदी हावभाव करून लग्नाबद्दल विचारलं. त्यांना मी 'कधीच नाही' अशा अर्थाचे हातवारे करून गप्प केलं आणि त्यापुढे, 'पुढे व्हा' या अर्थाचे हातवारे करायची तीव्र इच्छा दाबली.
कधी कधी लग्नाचा विषय काढल्यानी आपल्याला खूप क्लेश होतात असा चेहरा केला तर लोक गप्प बसतात. मग त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी दर्दभरी दास्ताँ आहे असं वाटू लागून थोडी सहानुभूती मिळते. पण आपली पाठ फिरली रे फिरली की समस्त काक्वांचं स्टिंग ऑपरेशन सुरु होतं. जग बघितल्याचा साईड इफेक्ट म्हणून माझ्या चेह-यावर दिल के टुकडे झाल्याचे बॉलीवूड भाव यायचे कधीच बंद झालेत.
आणि आधुनिक इमान्सीपेटेड महिलेची भूमिका घेतली तर आई रागवेल अशी भीती होती (इमान्सीपेटेड सारखा मॉमसीपेटेड असा शब्द हवा.).
म्हणून मी एक दिवस या प्रश्नाचं योग्य (खरं नव्हे) उत्तर आईला विचारलं (वाह. काय पण पी. एच. डी करताय. उत्तरं आईला विचारून सांगताय अजून?).
मग कुरुक्षेत्राकडे नेणा-या सारथ्यासारखी आई माझ्या अर्जुनपणाला धावून आली. आणि मला माझ्या निरोपसमारंभात माझ्या गाईडनी केलेल्या स्तुतीइतकंच अनपेक्षित उत्तर दिलं.
"सई, लग्न हा प्रश्न जितका सामाजिक आहे तितकाच वैयक्तिक आहे."
यानंतर दोन तास मला गीता ऐकावी लागणार याची खात्री झाली. पण त्यावर आईनी
"पुढच्या वेळेपासून प्रत्येक प्रश्नकर्त्याला वेगळं (सुरस, सरस आणि चमत्कारिक) उत्तर दे." असं सांगितलं!
"शक्यतो दोन भिन्न परंतु आपापसात परिचित अशा प्रश्नाकार्त्यांना दोन अति भिन्न उत्तरं दिलीस तर तुला असे बिनकामाचे लेख लिहायला अजून खूप जिन्नस मिळेल." हे ही वर घातलं!
[१] या लेखाची मांडणी राजच्या लेखनाने प्रेरित आहे. पी. एच. डी करताना स्वत:ला मत नसेल तर दुस-याची मतं अशी कंसात आकडे टाकून मांडता येतात. त्यामुळे मला ओरीजीनल स्टाईल नसल्याने राजचा रेफरन्स.
नमस्कार मंडळी!
गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा मराठीत लिहायला सुरुवात करावी अशी इच्छा मनात घर करू लागली. म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टंगळमंगळ न करता हे पान उघडायचं ठरवलं.
उन्हाळ्याच्या सुट्टीला मिळालेल्या प्रतिसादामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं. त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. या ब्लॉगवर स्मृतीरंजनापेक्षा माझ्या दैनंदिन आयुष्यात मला येणारे अनुभव, माझ्या वाचनात/पाहण्यात/ ऐकिवात  आलेल्या गोष्टी आणि माझी भटकंती यांचा संग्रह करायची इच्छा आहे. बघूया कितपत जमतंय. :)
सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!