Wednesday, January 11, 2017

आंटी मत कहो नाऽऽ

परवाचीच गोष्ट. मुलाला आजी आजोबा घेऊन गेल्याचा फायदा घेऊन मी दिवा उजेडी खाली पाळायला गेले. व्यायाम हा हक्काचा मी टाइम मला अगदी काल परवापर्यंत मिळायचा. पण अमीर खाननी घोळ घातला. दंगल बघून आल्यापासून नवऱ्याला महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला पहाटे आणि रात्री असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात. नवऱ्यानी व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून, मला काय फरक पडतो? त्याचं हृदय; आणि आता, 'नाही केला तर उत्तम, मला जास्त करता येईल' इथवर मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवलंय. त्यामुळे मधेच हा रणवीर पेशवा किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघडवून जातात. असो. तर मी माझ्या सातव्या राऊंडवर असताना मागून मला तो अत्यंत परिचित, तरीही तितकाच तिरस्करणीय आवाज ऐकू आला, "आंटी, बॉल देता का प्लिज?". मी आवाजाच्या दिशेनी पाहिलं, तर एका गुबगुबीत शेवरीच्या कापसाच्या उशीला टीशर्टचा अभ्रा घातल्यासारखा दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला. त्याच्या त्या गोंडस चेहऱ्यावर मला आंटी म्हणल्याबद्दल कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे माझा अहंकार गिळून मी चुपचाप बॉल उचलून त्याच्या दिशेने फेकला. इतका जोरात फेकला की त्याला तो आणायला शंबर एक मीटर पाळावे लागले. त्यातच समाधान मानून मी आठव्या राउंडला सुरुवात केली. मग उरलेले दोन तीन राउंड मी या आंटी न म्हणून घेण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार केला.
लोकांनी आंटी म्हणू नये म्हणून मी कित्येक दिवस मिंत्रावर "हल्लीची" पिढी काय घालते याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून डिस्ट्रेस्ड जीन्स घ्यावी असं माझं मत बनलं. मग आधी टेप शोधून काढली आणि स्वत:ची मापं काढली! खूप दिवस शॉपिंग कार्ट मध्ये लोळवून एकदाची ती सगळीकडे एकसारखी फाटलेली जीन्स घेतली. मी अशा प्रकारचे वस्त्र मागवले आहे, तेही ऑनलाईन, हे ऐकून मातोश्रींनी विचारसुमने उधळली (नवऱ्यानी हात टेकले आहेत हे वेगळे सांगायला नकोच).
"एका मुलाची आई आहेस तू आता. शोभलं पाहिजे हे सगळं. आणि कपडे संपूर्ण अंग झाकण्यासाठी असतात"
यावर मी "हूं" असा आवाज करून बायका करतात तसं पारंपरिक वाकडं तोंड केलं.
ठरल्या दिवशी माझं पार्सल आलं आणि उघडून बघितल्यावर लक्षात आलं की चित्रात दिसत होती तशी आणि तिथेच फाटलेली नसून, त्या नकाशाच्या बाहेरही जाऊन ती जीन्स फाटली होती. आता परत न्यायला येणाऱ्या माणसाला, "ती मला हवी तशी फाटली नाहीये म्हणून तुम्ही परत न्या", असं कसं सांगायचं या विवंचनेत मी पडले. पण त्यांनी काहीही न विचारता चुपचाप ती परत नेली. मग त्यापेक्षा हजार एक रुपये कमी देऊन मी बिन फाटकी जीन्स मागवली. त्यावर देखील, "फाटलेली जास्त महाग होती?" असे उग्दार मातोश्रींनी (नाटकी) डोळे विस्फारून काढले .
जीन्सचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मी माझ्या अस्मितेच्या शोधात एका काव्यवाचनाच्या मेहफिलीत गेले. डाव्या मतवादी लोकांनी बुजबुजलेल्या एका कॉफी शॉपच्या अंगणात हे असले कार्यक्रम होतात. आणि त्याला हजेरी लावणारे लोक अतिशय "इन" असतात. म्हणजे बसतात ते बाहेरच, ते पण अशा इतरवेळी फडतूस दिसणाऱ्या, पण अशा प्रसंगांची शोभा वाढवणाऱ्या बांबूच्या चटयांवर. काही महत्वाचे कवी पुढे गोमुखासनात बसून आपल्या टॅब्लेट्सवर आपले ब्लॉग्स उघडून कविता वाचून दाखवत होते. आणि बाकीचे आपापल्या फोनवर काहीतरी भलतंच करत बसले होते. कविता ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला पण लक्ष्य सारखं तिथे बसलेल्या कवींच्या चेहऱ्यांकडे जात होतं. सगळ्यांनी एकसारख्या झुडपासारख्या दाढ्या,आणि एखाद्या राजपुत योध्दयाला लाजवतील अशा पिळदार मिश्या ठेवल्या होत्या. पण माझ्या आंटीपणाचा पुरावा म्हणूनच की काय, त्यांच्या त्या रुपाकडे बघताना माझ्या मनात, ते सगळे किती "इन" किंवा "हॉट" आहेत या ऐवजी, सारखा एकच विचार येत होता. या सगळ्यांच्या आया आत्ता यांना घ्यायला आल्या तर आपला मुलगा कुठला हे कसं ओळखणार?
हे सगळे प्रकार झाल्यावर मी, आपण खरंच आंटी झालोय का, याची अशी वेळ आणि पैसे खर्च करून फेरतपासणी करणे बंद करायचे ठरवले. आणि माझ्या दैनंदिन जीवनातूनच डेटा गोळा करायला सुरुवात केली. आधी आंटी होणं याची व्याख्या करायचा प्रयत्न केला. त्यात अर्थातच आधी, पंचवीस वर्षांपूर्वी आई जे काय काय डायलॉग मारायची ते मारले. मी कशी लवकर उठते, घरातलं सगळं बघते (नवऱ्याच्या मदतीचा करेक्शन फॅक्टर लावून), किती अवघड आहे आजकालच्या काळात. "जबाबदाऱ्या" आल्या की कसं आपटूडेट राहता येणार? पेपर वाचायला सुद्धा वेळ नसतो (हा अनालॉग पेपर. डिजिटल पेपरचं सलाईन दिवसभर चालू असतं, तसं). मग स्वस्तुती आणि स्वदया (सेल्फ पिटी?) मधून बाहेर आल्यावर लक्षात आलं, की "तरुण मनात" असतात तितक्या तीव्र भावनाच आता बहुतेक मनात उरल्या नाहीयेत.
पूर्वी आपण कसे दिसतो, आरशात कसे दिसतो आणि चार चौघात कसे दिसतो वगैरे फार महत्वाचं वाटायचं. आता जर कुणी येऊन माझ्या दिसण्यावर टिप्पणी केली, तर "गेलास/गेलीस उडत", याखेरीज दुसरे वाक्य डोक्यात येत नाही. फक्त कानाला अजून आंटी शब्द खटकतो (पण त्याचीही सवय होईल). किंवा कुणी बिचारा प्रेमात मजनू झाला असेल तर त्याच्या मोहब्बतीचे कौतुक न वाटता, त्याचे रडे संपल्या संपल्या, "तू अनुरूपवर जा. तिथे खूप ऑप्शन्स आहेत" असं सुचवायची खुमखुमी मारून टाकावी लागते. विशीतला बराच काळ स्वतःच्या भावनाच मॅनेज करण्यात गेला. आणि आता बराचसा वेळ स्वतःचा आणि कुटुंबाचा वेळच मॅनेज करण्यात जातो. त्यामुळे बऱ्याचदा, ज्यांच्याकडे स्वतःबद्दल खूप विचार करायला वेळ आहे त्यांची असूया वाटू लागते. आणि यातच आपले आंटीकरण सामावलेले आहे असा निष्कर्ष मी काढला. पण या छोट्याशा साक्षात्काराचे रूपांतर, "आमच्यावेळी" या शब्दाने सुरु होणाऱ्या असंख्य कंटाळवाण्या प्रवचनांमध्ये होऊ नये म्हणून, अधून मधून विशीत एक फेरफटका मारून आलेच पाहिजे.

Thursday, January 5, 2017

मन कशात लागत नाही

बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं. आपल्या इथपर्यंतच्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलीच दिशा नाही ही मनाशी ठामपणे ठरवलेली गोष्ट नक्की त्या माणसाला कशी सांगायची या विचारानेच रडू येत होतं. त्यात तो बर्फ, सभोवताली पसरलेला, कुठे कुठे काळामिट्ट झालेला तर कुठे कुठे थरावर थर बसून अक्राळविक्राळ झालेला. बसने गेल्यामुळे मी अर्धा तास आधीच पोहोचले, म्हणून मग तिथेच असलेल्या स्टारबक्समध्ये माझी आवडती कॉफी घेऊन पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागले.
"खरंतर असं कौन्सेलरकडे वगैरे जाण्यासारखं काहीच नाहीये. आपल्याला अशा काय जबाबदाऱ्या आहेत. मिळालेला पैसा आपण भारी भारी स्नो बूट्स नाहीतर जीन्स घेण्यात उडवतो. इथे अशी हवी तशी कॉफी घेऊन कुठल्यातरी दुःखाचं पोस्ट मॉर्टम करायची वाट बघतोय. रिडिक्यूल्स!"
पुन्हा तेच विचारचक्र सुरु झाले. मोठ्या माणसांकडून कित्येक वेळा ऐकलं होतं. "काही जबाबदाऱ्या नाहीत ना म्हणून येतं हे असं डिप्रेशन."
"तुमच्या पेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बघा"
हे सगळे आवाज हळू हळू माझाच आतला आवाज बनून गेले होते. एक क्षण वाटलं नकोच ते. असंच परत जावं. पण आपण कुणालातरी सकाळी सात वाजता या अशा थंडीत आपल्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे असं पळून नाही जायचं, असा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये गेले.
जॉनथन च्या ऑफिस बाहेर लांबच लांब कॉरिडॉर होता. ठोकळ्यासारख्या बिल्डिंगमध्ये तो करडा चौकोनी कॉरिडॉर अजूनच खच्ची करत होता. मधेच आपल्याला जे वाटतंय तो या गावाचा तर परिणाम नाही ना, असाही विचार डोकावून गेला मनात. तेवढ्यात त्या लांबलचक कॉरिडॉर च्या दुसऱ्या टोकाला एक उंच माणूस खांद्यावर सायकल लटकवून येताना दिसला. जशी जशी त्याची आकृती जवळ आली तशी मी त्याला कधीही पाहिलेलं नसताना देखील हा तोच आहे अशी मला खात्री पटली. त्यानीदेखील मला ओळखलं असावं, कारण माझ्याशी हस्तांदोलन करायच्या खूप आधीच, लांबूनच माझ्याकडे बघून तो हसला. त्या निर्मळ आणि खुल्या हास्याच्या आठवणीचा देखील मला खूप आधार वाटतो.
पुढचे सात आठवडे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारची मी अतिशय आतुरतेने वाट बघू लागले. जॉनाथन चूक बरोबर अशा पठडीतून माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याच्या बरोबर बोलून नेहमीच हलकं वाटायचं आणि त्यानी दिलेले होमवर्क करण्यात प्रचंड मजा यायची. थोडेच दिवसांत नुसतं त्याला भेटण्याबद्दल नाही, तर त्या सकाळच्या बर्फात पाऊलखुणा उमटवण्यापासून ते अर्धा तास आधी पोचून, कॉफी पिण्याबद्दलदेखील मला प्रेम वाटू लागलं. आणि ज्या गोष्टीमुळे मला जॉनाथनकडे जावं लागत होतं, त्या आयुष्यात घडल्याबद्दल कुठेतरी थोडीशी कृतज्ञतादेखील वाटू लागली. हा योग्य शब्द आहे नाही माहिती नाही, पण आपण इंग्रजीमध्ये ज्याला 'बीइंग ग्रेटफूल' असं म्हणतो तसं काहीसं.
हे सगळे प्रसंग मी "डिअर जिंदगी" हा सिनेमा बघताना (रडत रडतच) पुन्हा जगले. सिनेमा बघताना रडण्यात माझा आधीपासूनच हातखंडा आहे. आणि यावर्षी पिंक, डिअर जिंदगी, दंगल असल्या सिनेमांनी माझ्या या स्वभावाला खच्चून प्रोत्साहन दिले आहे. हा काही डिअर जिंदगीचा रिव्यू नाही. पण ज्या सिनेमानी एका दर्शकाला आपला अनुभव लिहायला असं प्रोत्साहित केलं त्याचा रिव्यू वगैरे लिहायची काहीच गरज नाही.
आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.
अशी मदत न घेण्याची कित्येक कारणं आपल्याकडे असतात. पण अशी मदत घेऊन आपण कमकुवत आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देत आहोत असा समज करून घेणे धोक्याचे आहे. दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.
अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे. नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.
त्यामुळे जर कुणी मी पहिल्या अपॉइंटमेंटच्या आधी तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.